कोईम्बतूर – भारतीय संस्कृतीत भुकेल्यांना अन्नदान करण्याचे मोठे महत्त्व आहे. समाजातील गरजू आणि काबाडकष्ट करूनही पुरेसे अन्न मिळत नसलेल्यांची प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार अन्नदान करून सेवा करणे, हे एक महत्त्वाचे कर्तव्य मानण्यात आले आहे. तामिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये अशीच एक महिला गोर-गरीब, भुकेल्यांना मोफत बिर्याणी वाटत असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
देशामध्ये गरीब लोकांची संख्या कमी नाही. आजही देशात कित्येक लोकांची उपासमार होत असते. गेल्यावर्षी कोरोनामुळे लावलेल्या लॉकडाऊनमुळे यंदा भारतातील गरिबी वाढल्याची बातमी नुकतीच आली होती. तर, दुसरीकडे काही जण अशा लोकांना अन्नदान करतानाही दिसून येत आहेत. कोईम्बतूरमधील एका महिलेने अशाच प्रकारे गोर-गरीब, भुकेल्यांना बिर्याणीचे मोफत वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
What a great gesture by this small roadside biryani shop in Puliakulam, Coimbatore.! Humanity at its best !!! ❤️ pic.twitter.com/VZYWgRzwaN
— RJ Balaji (@RJ_Balaji) April 15, 2021
फुलियाकुलम गावातील ही महिला गरजूंना बिर्याणीची पाकिटे वाटप करीत आहे. या महिलेचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या फोटोत दिसत आहे की, या महिलेने आपल्या छोट्या सेटमध्ये बिर्याणीची पाकिटे ठेवली आहेत. ही महिला फक्त 20 रुपयांना बिर्याणीची एक प्लेट विकते. पण, ती गरिबांकडून बिर्याणीचे पैसे घेत नाही. त्यांनाही ती प्लेट भरून बिर्याणी देत आहे. भुकेल्या आणि आर्थिक अडचणींमुळे ज्यांच्यावर दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे, अशा लोकांना खायला घालायचे आहे, असे या महिलेचे म्हणणे आहे.
या महिलेच्या छोट्या दुकानाबाहेर एक फलकही आहे. ज्यावर तामिळ भाषेत असे लिहिले आहे की, तुम्हाला भूक लागली असेल तर येथून बिर्याणीचे पॅकेट घ्या. बरेच लोक या महिलेने मानवतेचे उदाहरण घालून दिले आहे, असे म्हणत तिचे कौतुक करत आहेत. तर, काहीजण असे म्हणतात की, अशा लोकांमुळेच जगात माणुसकी उरली आहे. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच सुमारे 12,000 लोकांनी याला लाईक केले आहे आणि 2000 पेक्षा जास्त वेळा ही रिट्विट केली गेली आहे.






