श्रीनगर (ऑल इंडिया उपसंपादक राजन चौधरी) : कोरोना महामारीमुळे जवळपास गेल्या दीड वर्षापासून राज्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा सुरू करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. येत्या ४ ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचं पालन करून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र त्याआधी जम्मू काश्मीरमध्ये आता कोरोनाचा धोका समोर येतोय.
जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील एका खासगी शाळेतील तब्बल ३२ विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता जम्मू काश्मीरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कोरोना रूग्णसंख्या कमी झाल्याने जम्मू काश्मीर प्रशासनाने शाळा उघण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता विद्यार्थ्यांनाच कोरोना झाल्यानं प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत.
शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांची कोरोना चाचण्या कराव्यात अशी सूचना प्रशासनाने केली होती. त्यानंतर आता ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. अद्याप १८ वर्षाखालील मुलांना लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली नाही, त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहत आहे.
दरम्यान, मागील महिन्यात महाराष्ट्र सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पंजाबमधील शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे घेतला होता. आता पुन्हा शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.






