श्रीनगर – हिवाळ्यापूर्वी भारतात 300 दहशतवादी घुसण्याच्या तयारीत असल्याचं लष्कराने सोमवारी सांगितलं. पाकिस्तानात सीमेवर असलेल्या तळांवर हे दहशतवादी आहेत. हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे काश्मीरमध्ये दऱ्या खोऱ्यांमधले सगळे मार्ग बंद होतात. त्या आधी पाकिस्तान या दहशतवाद्यांना भारतात घुसविण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे सीमांवर लष्कर सतर्क असून हे सगळे प्रयत्न हाणून पाडले जातील असंही लष्कराने म्हटलं आहे.
बर्फवृष्टीमुळे पुढचे काही महिने काश्मीरातले सगळे व्यवहार थंडावतात. त्याचबरोबर चोरवाटाही बंद होतात. त्यामुळे दहशतवाद्यांना भारतात घुसणे कठिण काम असतं. त्यामुळे दरवर्षी पाकिस्तान हे काम करत असतो.
अनेक वेळा भारताकडून मार खाल्ल्यानंतरही पाकिस्तानला अजुनही जाग आलेली नाही. गेल्या वर्षभरात पाकिस्तानने 3800 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याची धक्कादायक माहिती परराष्ट्रमंत्रालयाने दिली आहे. त्याच बरोबर पाकिस्तान आता ड्रोन्सचा वापर करत भारतात दहशतवाद्यांना शस्त्रे आणि ड्रग्ज पुरवढा करत असल्याचा धक्कादायक खुलासाही परराष्ट्रमंत्रालयाने केला आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये यासंबंधात काही घटना उघडकीस आल्या होत्या. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत यावरून पाकिस्तानवर ठपका ठेवला आहे. पाकिस्तान अजुनही दहशतवाद्यांना मदत करत असल्याच्या आरोपांचाही भारताने पुनरुच्चार केला आहे.
पंजाब आणि काश्मीरमधल्या सीमावर्ती भागात ड्रोन्सचा वापर करून पाकिस्तान दहशतवाद्यांना शस्त्रांचा पुरवढा करतो आहे. अशा प्रकारची अनेक ड्रोन्स सुरक्षा दलांना ताब्यात घेतली आहेत. AK-47सारख्या अत्याधुनिक रायफल्सचा त्यात समावेश होता. एवढच नाही तर ड्रग्जचाही त्यात समावेश असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळ भारताने गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
दरम्यान, चीन सोबतची लष्करी आणि राजकीय स्तरावरची चर्चा सुरूच राहणार असल्याचं भारताने म्हटलं आहे. सीमेवरच्या तणावाचं वादात आणि वादाचं रुपांतर गंभीर स्थितीत होणार नाही याची काळजी घेण्याचं दोन्ही देशांनी मान्य केल्याचंही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.







