सोने तस्करी प्रकरणी एनआयएचे सांगलीमध्ये छापे

gold

सांगली (जिल्हा प्रतिनिधी शरद मोरे) – दोन महिन्यांपूर्वी दिल्लीत रेल्वे स्टेशनवर ८३ किलो सोने जप्त करण्यात आले होते. या सोन्याच्या तस्करी प्रकरणी राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण शाखेच्या ( एनआयए ) अधिकाऱ्यांनी सांगली जिल्ह्यात गुरुवारी छापे टाकले. जिल्ह्यातील आटपाडी आणि खानापूर येथे संशयितांच्या घरांची झडती घेतली. या कारवाईत काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली असून, तस्करीचे सोने नेपाळ, भूतान आणि म्यानमारमध्ये कोणाकडे पाठवले जाणार होते, याचा तपास सुरू असल्याचे एनआयकडून सांगण्यात आले.

 

सोने तस्करी प्रकरणी दिल्ली पोलिसांनी २८ ऑगस्ट रोजी आठ संशयितांना अटक करून त्यांच्याकडील ४२ कोटी ३९ लाख रुपये किमतीचे ८३ किलो सोने जप्त केले होते. सोन्याची तस्करी करणारे रविकिरण गायकवाड, पवन कुमार गायकवाड, योगेश हणमंत रुपनर, अभिजित बाबर, सद्दाम पटेल, अवधूत अरुण विभूते, सचिन आप्पासो हसबे, दिलीप लक्ष्मण पाटील यांना अटक करण्यात आली. अटकेतील हे सर्वजण सांगली जिल्ह्यातील आटपाडी आणि खानापूर परिसरातील आहेत. या गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी एनआयएने बुधवारी आटपाडी आणि खानापूर येथे संशयितांच्या घरांवर छापे टाकले. या कारवाईत संशयितांच्या घरांमधून काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.

 

संशयितांनी गुवाहाटीमधून आणलेले सोने पुढे नेपाळ, भूतान आणि म्यानमारला पाठवले जाणार होते. हे सोने नेमके कोणाकडे आणि कशासाठी पाठवले जाणार होते, याचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, दिल्लीतून एनआयएचे १० अधिकाऱ्यांचे पथक बुधवारी सांगलीत दाखल झाले. त्यांना जिल्हा पोलिसांमार्फत आवश्यक ती मदत पुरविण्यात आली, अशी माहिती पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here