चंदीगड – पंजाबच्या लुधियाना येथे एकाच कुटुंबातील चार जण मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली. लुधियानाच्या मयूर विहार कॉलनीमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या झाली. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अतिरिक्त पोलिस उपायुक्त समीर वर्मा यांनी सांगितलं की, मृत सर्वांची हत्या ही धारधार शस्त्राने करण्यात आली आहे. या घटनेत व्यावसायिक असलेले राजीव सूद यांची पत्नी सुनिता सूद, मुलगा आशिष, सून गरिमा आणि 13 वर्षीय मुलाची हत्या झाली आहे. घटनेवेळी राजीव सूद हे घरी नव्हते, असंही पोलिसांनी सांगितलं.
गरिमाचे वडील जेव्हा तिला भेटण्यासाठी घरी आले, तेव्हा हे सर्व प्रकरण पुढे आलं. गरिमाच्या वडिलांनी बराच वेळ बेल वाजवली, दार ठोकलं, पण कुणीही दार उघडलं नाही. त्यानंतर त्यांनी शेजारी आणि पोलिसांना याची सूचना दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेमागे कौटुंबिक वाद असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांना राजीव सूदची गाडीही मिळाली आहे. त्यांच्या गाडीला साऊथ सिटी परिसरातून ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांना ही गाडी जळालेल्या अवस्थेत मिळाली आहे. मात्र, कारमध्ये कुणीही नव्हतं. राजीव सूद हे सध्या बेपत्ता आहेत.
या चार जणांच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहे. मात्र, या चौघांची हत्या का झाली, कुणी केली याबाबत अद्याप कुठलीही माहिती नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.







