अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – पश्चिम बंगाल राज्यातील दोन तरुणींची चिपळूण तालुक्यातील खेर्डीतील एका भाजी व्यावसायिकाच्या तावडीतून सुटका करण्यात आली. या प्रकरणी भाजी व्यावसायिकावर फोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आले आहे. मुहमद वासिम दुवाबक्ष शेख असं आरोपीचं नाव आहे.
नोकरी लावून देतो असं सांगत या तरुणींना महाराष्ट्रात आणण्यात आलं होतं. गेल्या दोन महिन्यांपासून या तरुणींवर अत्याचार करण्यात येत होतं. हा प्रकार समजताच हेल्प फाऊंडेशन आणि पोलिसांच्या मदतीने थरारकपणे या तरुणींची सुटका करण्यात आली.
पीडित तरुणींची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांच्यावर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. अनैतिक व्यवसाय किती दिवस सुरू होता, कोण कोण यामध्ये सहभागी आहेत, याचा पोलीस शोध घेत आहेत, अशी माहिती पोलिस निरिक्षक देवेंद्र पोळ यांनी दिली. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात एक मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शहरात असणाऱ्या खेर्डी येथे भाजीपाला व्यवसाय करणारा मुहमद वासिम दुवाबक्ष शेख याने पश्चिम बंगाल येथील दोन तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून येथे आणले होते. मात्र त्यांना नोकरी मिळवून न देता अनैतिक व्यवसायासाठी जुंपले होते. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी रेस्कु ऑपरेशन करीत त्या पीडीत मुलींची सुटका केली.
या प्रकरणी मुहमद वासिम दुवाबक्ष शेख यांच्यावर फोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक झाली आहे. त्याला न्यायालयात हजर केली असता 30 नोव्हेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी चिपळूण पीडित तरुणीना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. हे रॅकेट मोठे असू शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे.







