जनतेच्या सहकार्याचे आभार : विरोधकांना संयमाचे आवाहन
धरणगाव (उपसंपादक प्रा पी एम पाटील) – गेल्या चार पाच दिवसांपासून मेन पाईपलाईन गाळमातीने तुडुंब भरल्याने शहराचा पाणीपुरवठा बंद झाला होता. त्यामुळे शहरात पाणीटंचाई समस्या उद्भवली होती. पाईपलाईनमधील गाळ काढल्यानंतर आता पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी यांनी बुलंद पोलीस टाइम्सशी बोलतांना सांगितले.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, धरणगावकर नागरिकांच्या आशीर्वादाने आणि पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांचे मार्गदर्शन, सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने मी नगराध्यक्ष म्हणून गावातील पाणी टंचाईची तात्पुरती उदभवलेली समस्या दूर करु शकलो आहे. आज पाणी पुरवठा पुर्ववत सुरु करतांना केलेल्या श्रमाची पूर्ती होत असल्याचा भाव माझ्या मनी आहे. विरोधकांनी केवळ विरोधाला विरोध न करता, संकट समयी मदतीचा हात पुढे करायला हवा असं आवाहन मी या निमित्ताने करतो. विरोध, शक्तिप्रदर्शन हे निवडणुकीचे शस्त्र आहेत. ते त्यावेळी काढायला कुणाचेही दुमत नसावे. मात्र, संकटकाळी त्याचा वापर म्हणजे संधीसाधूपणाच नाही का ?
गेल्या चारपाच दिवसापासून मेनपाईप लाईन गाळमातीने तुडुंब भरल्यामुळे पाणीपुरवठा बंद झाला होता. यामुळे शहरात पाणी टंचाईची समस्या उद्भवली होती. याचं गांभिर्य समजून न घेता विरोधकांनी यावर आपली पोळी शेकून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पक्षीय राजकारणाकडे लक्ष न देता आम्ही पाणी समस्या दूर करण्यासाठी निकराने लढलो. रात्रीचा दिवस केला. चोवीस तास मजूर राबवले. अंधाऱ्याराती, सापांच्या वावर अशा बिकट परीस्थितीत पाईप फोडून गाळ काढला. पाणी सुरु असतांना वेल्डिंग आटोपले. आणि आता सर्वांच्या सदिच्छांनी पाणीपुरवठा पुर्ववत करत आहोत.
काही काळ गाळामुळे पाणी गढूळ येण्याची शक्यता आहे. सद्य परिस्थितीत आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. पाणी गाळून, उकळून त्यात जंतूनाशक, औषधी टाकून पाण्याचा वापर करा. आरोग्याची काळजी घ्या. सुखरुप रहा !
जनसेवेचे काम करणे म्हणजे व्रत असते. यात स्वतःचा स्वार्थ, लाभ, नफा, तोटा बाजूला ठेवून मी जनसेवेसाठी सज्ज झालेला आहे. आपला विश्वास, प्रेम हीच माझी श्रीमंती आहे. ती भविष्यातही आटू नये, असा आशावाद त्यांनी शेवटी बोलतांना केला.







