कळंबोली परिसरातील महिलेची गळा दाबून हत्या

murder

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – नवी मुंबईतील कळंबोली परिसरातील एका बंद फ्लॅटमध्ये एका २६ वर्षीय महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. तीन आठवड्यांपूर्वीच या महिलेची हत्या झाली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. हत्येनंतर फ्लॅट बंद करून मारेकरी फरार झाला असावा, असा कयास आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, लिपी सागर शेख उर्फ रीना शेख असे या महिलेचे नाव आहे. महिला बांगलादेशी असून, ती अवैधपणे येथे वास्तव्यास होती, असे सांगण्यात येत आहे. रीना ही अन्य दोन बांगलादेशी महिलांसोबत फ्लॅटमध्ये राहत होती. नवी मुंबईत ती नोकरी करत होती.

 

लॉकडाऊनच्या काळात या तिन्ही महिलांची नोकरी गेली होती. रीनाची एक सहकारी बांगलादेशमध्ये परतली. सध्या ती फ्लॅटमध्ये एकटीच राहात होती. सोमवारी तिची अन्य एक सहकारी बांगलादेशमधून परतली. तिने फ्लॅटमध्ये पाहिले असता, रीनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांना माहिती दिली असता, ते घटनास्थळी पोहोचले. तिच्या सहकाऱ्यांनी सांगितले की, ती लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहात होती.

कळंबोली पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, तिच्या लिव्ह-इन-पार्टनरचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, या तिन्ही बांगलादेशी महिला बेकायदा वास्तव्य करत होत्या. त्यामुळे त्यांनाही अटक करण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here