ओबीसींचे राजकीय भवितव्य आणि भाजपची नौटंकी

    dyanesh-wakudkar

    – ज्ञानेश वाकुडकर, अध्यक्ष – लोकजागर

    ओबीसींची जातीनिहाय स्वतंत्र जनगणना होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. भाजपा सरकार हे ओबीसी विरोधी आहे, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्राच्या पुढील राजकारणावर आता ओबीसी समाजाचा मोठा आणि ऐतिहासिक प्रभाव असणार आहे, ह्या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत. त्याचाच परिणाम म्हणून देवेंद्र फडणवीस यांना ओबिसीच्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरू, अशी नौटंकीबाज घोषणा करावी लागली आहे.

     

    केंद्रातील भाजपा सरकारची मनोवृत्ती मुळातच विकृत, खुनशी, देशद्रोही आणि धर्मांध आहे, हे पुन्हा पुन्हा स्पष्ट झालेलं आहे. सरकार शेतकऱ्यांच्या मरणाची वाट बघत आहे. नोटबंदी, लॉक डाऊन, किसान आंदोलन अशा विविध प्रसंगी मरणाऱ्या लोकांचीही टिंगल टवाळी करण्यात भाजपचे लोक विकृत आनंद घेतांना दिसतात. त्यांचे सहकारी असलेले मानसिक रुग्णही त्याबाबतीत आघाडीवर आहेत. शेतकऱ्यांच्या विरोधात सतत विखारी प्रचार करत आहेत.
    देश रसातळाला जात आहे. आणि तुम्ही आम्ही पोरकट कॉमेंट्स टाकून या सैतानांचा केवळ सोशल मीडियातून विरोध करत आहोत. पण येथेच थांबून चालणार नाही. त्यासाठी ठोस कृती करावी लागेल. यासंदर्भात लोकजागर पार्टी तर्फे आम्ही आमची भूमिका जाहीर करत आहोत. कृपया नीट वाचा. विचार करा. समजून घ्या आणि ठोस कृती करा. ओबीसी जनगणनेसाठी खासदारांनी, आमदारांनी राजीनामे द्यावेत, असल्या निरर्थक गोष्टी करण्यात वेळ घालवू नका. कुणीही राजीनामे देणार नाहीत. मोर्चे, निवेदन, उपोषण, परिषदा, बहिष्कार ह्या गोष्टींचं नक्कीच महत्व आहे. त्यामुळे वातावरण निर्मिती व्हायला मदत होते, हे खरं आहे.

     

    न्यायालयात जाणे, हा शह – काटशह ह्या गोष्टींचाही लढाई पुढं नेण्यासाठी किंवा वातावरण निर्मितीसाठी कमी अधिक प्रमाणात हातभार लागू शकतो. पण त्या अंतिम आहेत, अशा भ्रमात आपण राहता कामा नये. कृपया त्यातून बाहेर या. लोकशाहीमधे खरी लढाई ही मतपेटीच्या माध्यमातूनच लढायची असते, ह्याची स्पष्ट जाणीव असू द्या. त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. ‘मतदान कुणालाही करा, पण मोर्चात सहभागी व्हा’, अशी भूमिका काही लोक मांडताना दिसतात. किंवा ‘कोणत्याही पक्षातून असो, पण आपला माणूस (.. म्हणजे आपल्या जातीचा माणूस ) निवडून आला पाहिजे’ ही भूमिका देखील शुद्ध बनवाबनवीची किंवा अत्यंत चुकीची आहे, हे आधी समजून घ्या. ह्याच न्यायानं आताही ओबीसी – बहुजन आमदार, खासदार पायलीचे पन्नास आहेत, मग ते काय करतात ? त्यानंतरही आपल्याला मोर्चे का काढावे लागतात ? तेव्हा एखादे निवेदन, फोटो, एखादे स्टेटमेंट असल्या भंपक गोष्टीवर भुलू नका. ही गोळ्या – बिस्कीटांची लढाई नव्हे, धोरणात्मक लढाई आहे. त्यामुळे पक्षाच्या धोरणानुसारच हे लोक चालत असतात, हे लक्षात ठेवा. ते कधीही पक्षाच्या विरुद्ध जाऊन तुम्हाला मदत करणार नाहीत.

     

    जे लोक अशी दिशाभुल करणारी भूमिका घेतात, त्यांना एकतर तेवढी समज नाही किंवा त्यांच्या मनात काहीतरी वेगळीच गोष्ट आहे, याची खात्री बाळगा. अशा लोकांपासून सावध राहा. त्यांच्यापासून समाजाला, आंदोलनाला खरा धोका आहे, हे निश्चित समजा. आपला भाऊ डाकूंच्या टोळीत सहभागी असेल, तर आपण त्याचा अभिमान वाटून घेणार का ? त्याची पाठराखण करणार का ? याचा अर्थ तुम्हीही डाकूंनाच सामील आहात, असा होत नाही का ? लक्षात ठेवा, तो प्रामाणिकपणे तुमची बाजू कधीही घेणार नाही. जो टोळीत असेल तो तुमचा नाही, जो तुमचा असेल तो टोळीत राहू शकत नाही ! उगाच भ्रमात राहू नका. सद्याचा भाजपा हा देशद्रोही पक्ष आहे, मोदी – शहा यांनी देशाचा कडेलोट केलाय ! पण प्रत्यक्षात ते ना तुम्हाला ओळखत ना मला ओळखत. मात्र त्यांच्या पक्षाचे जे लोक आपल्या अवती भवती आहेत, ते ह्या टोळीला मजबूत करतात. ते पापाचे खरे भागीदार आहेत. म्हणून आधी त्यांच्यापासून राजकीय दृष्ट्या अंतर बाळगून रहा. त्यांना मतदान करू नका. त्यांना राजकीय ताकद देवू नका. त्यांचे स्वागत, सत्कार करू नका.

     

    काही जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या आहेत. तशा त्या वरवर पाहता पक्षीय स्वरूपाच्या नसल्या तरी इथूनच लोकशाहीची खरी सुरुवात होते. तुम्हाला चांगली सुरूवात गावापासून करावी लागेल. त्यासाठी फार काही लागत नाही. फक्त स्वच्छ मनाने आणि प्रामाणिक हेतूने एकत्र या. जात, पात, धर्म बाजूला ठेवा. सत्याच्या बाजूनं उभे रहा. ही निवडणूक एक सत्याग्रह आहे, असे समजून बांधणी करा. नव्या दमाचे तरुण, काही अनुभवी जाणती मंडळी, महिला आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घ्या. ‘आमचं गाव, आमचं सरकार’ ही भावना मनामनात जागवा.
    महाराष्ट्राच्या राजकारणात नवा स्वतंत्र पर्याय निर्माण व्हावा, यासाठी – ५२ टक्के ओबीसी, ५२ टक्के आरक्षण, ओबीसी मुख्यमंत्री, बहुजन सरकार, राजकीय समतेसाठी, सत्तापरिवर्तन ही त्रिसूत्री घेवून लोकजागर पार्टी मैदानात आली आहे.

     

    लोकजागर पार्टीचा अकरा कलमी कार्यक्रम आखलेला असून, यात १. झिरो ते हिरो अर्थव्यवस्था, २. जनतेचा उमेदवार, लोकांची लोकशाही !, ३. गाव तिथे उद्योग, घर तिथे रोजगार !, ४. कृषी धर्म, कृषी संस्कृती !, ५. सामाजिक उद्योग, सामाजिक सरकार !, ६. मोफत शिक्षण, मोफत आरोग्य !, ७. एक गाव, एक परिवार !, ८. शंभर युवा, महाराष्ट्र नवा !, ९. गतिशील न्यायालये, पारदर्शी न्याय !, १०. प्रगत महिला, समर्थ समाज !, ११. सर्वसमावेशक समाज, सर्वसमावेशक सत्ता ! आदी मुद्द्यांचा समावेश आहे.

    – ज्ञानेश वाकुडकर
    अध्यक्ष, लोकजागर पार्टी

     

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here