कुलू मनाली येथे आगीत होरपळल्याने महाराष्ट्रातील जवान शहीद

kailas-dahikar

वर्धा (जिल्हा प्रतिनिधी मनोज बाचले) – भारतीय लष्करात कार्यरत असलेल्या अमरावती जिल्ह्यातील एका जवानाचा कुलू-मनाली परिसरातील भारत-चीन सीमेजवळच्या एका पॉइंटवर कर्तव्यावर असताना आगीच्या दुर्घटनेत होरपळून मृत्यू झाला. कैलास कालू दहिकर (वय २७, रा. पिंपळखुटा, ता. अचलपूर ) असे या जवानाचे नाव आहे.

कैलास दहिकर हे भारतीय सैन्यात ‘१५ बिहार’मध्ये कार्यरत होते. ते २३ डिसेंबर रोजी रात्री हिमाचल प्रदेशातील कुलू-मनाली येथे कर्तव्यावर होते. तेथील कडाक्याच्या थंडीपासून बचावासाठी त्यांनी ड्युटी संपल्यानंतर रात्री केरोसिनवर चालणारी शेगडी (हिटर) लावली होती. ते झोपेत असतानाच आग लागून होरपळून त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. कैलास दहिकर यांचे पार्थिव येत्या दोन दिवसांत नागपूर येथे विमानाने आणले जाणार आहे. त्यानंतर त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रत्नाकर चरडे यांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, दीड वर्षाची मुलगी व आप्तपरिवार आहे.

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीटरच्या माध्यमातून कैलास दहिकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अमरावतीतील जवान कैलास दहिकर यांना कुलू-मनाली येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले आहे. भारतमातेच्या या वीर सुपुत्राला भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत, अशा भावना अनिल देशमुख यांनी व्यक्त केल्या.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here