समाजवादी आमदार आशुतोष सिन्हा यांचे वादग्रस्त विधान
मिर्जापूर – कोरोना या जागतिक महामारीच्या काळातही राजकीय पक्षांकडून राजकारण आणि बेताल वक्तव्यांची मालिका सुरुच आहे. समाजवादी पक्षाचे (सपा) राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ही लस भाजपची आहे ती टोचून न घेण्याच्या विधानानंतर आता आमदार आशुतोष सिन्हा यांनी वादग्रस्त विधान केले आहे.
मिर्जापूर येथील आमदार आशुतोष सिन्हा यांनी भाजप सरकारवर हल्ला चढविला. ते म्हणाले की, कोविड-१९ च्या लसीमध्ये असे काहीतरी आहे जे लोकांचे नुकसान करु शकते. उद्या लोक म्हणतील की ही लस त्यांना मारण्यासाठी किंवा लोकसंख्या कमी करण्यासाठी दिली गेली आहे. काहीही होऊ शकते, हे देखील शक्य आहे की ही लस घेतल्यानंतर लोक नपुंसक होतात.
अखिलेश यादव यांनी ही लस न घेण्याची घोषणा केल्याच्या विधानावर आशुतोष सिन्हा म्हणाले की, अखिलेश यांच्या विधानाची आपल्याला कल्पना नाही. जर त्यांनी असे म्हटले असेल तर ते निश्चितच गंभीर असेल. कारण हे सरकार जे उत्तर प्रदेश आणि देशाचे सरकार आहे, असे सरकार आहे की जिथे गोरखपूरमध्ये ऑक्सिजनच्या अभावामुळे मुले मरण पावली, तिथे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आहे. त्या ठिकाणी त्यांनी दोन ते चार दिवसांपूर्वी त्यांनी भेट दिली.
आमदारांनी केलेल्या अजब दाव्यानंतर देशाचे औषध महानियंत्रक व्ही. जी. सोमाणी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, थोडा जरी सुरक्षेबाबत साशंकता असल्यास आम्ही कशालाच मान्यता देणार नाही. व्हॅक्सिन ११० टक्के सुरक्षित आहे. किंचिंतसा ताप, वेदना आणि ॲलर्जी हे प्रत्येक व्हॅक्सिनमध्ये सामान्य बाब आहे. जर कोणी लोक म्हणत असलील नपुसंक होते तर ते पूर्णत: मुर्खपणाचे आहे.







