कोईम्बतूर – असं म्हणतात दारी आलेल्या माणसाला उपाशी ठेवू नये. भूक लागलेल्या माणसाला पोटभर खाऊ घातलं की पुण्य मिळते. असंच काम करणारी एक महिला सध्या सगळ्यांसाठी आदर्श ठरलेय. कोईम्बतूर येथे राहणारी ही महिला गरीबांना स्वत:च्या हाताने बनवलेली बिर्याणी खायला देते. तेही कोणताही मोबदला न घेत! अगदी निस्वार्थीपणे. अन्नपूर्णा या नावाने ती ओळखली जातेय.
अन्नपूर्णा स्वत:च्या घराबाहेर बिर्याणीचा स्टॉल लावते. केवळ 20 रुपयांत एक प्लेट बिर्याणी विकते. हा दर सगळ्यांसाठी इतकाच आहे. मात्र त्यांच्या स्टॉलवर पुणी भुकेला माणूस आला आणि त्याच्याकडं पैसे नसले, तरी त्याला ती प्रेमानं आधी बिर्याणी देते आणि त्याच्याकडून एक रुपयाही घेत नाही. हवी तेवढी बिर्याणी ती ग़रीब माणसांना देते. ती सांगते की, माझा हेतू केवळ भुकेल्यांना जेवण देणं इतकाच आहे. मी एरव्ही बिर्याणी वीस रुपयांना विकते. मात्र ज्यांच्याकडे पैसा नाही आणि खरोखर जे भुकेले आहेत ते माझ्याकडे आले तर नक्कीच विनामूल्य जेवून जातील. शहरात सध्या महिलेची खूप चर्चा आहे. अनेक लोक कुतूहलापोटी या महिलेच्या स्टॉलला भेट देत असतात.







