उन्नाव (उत्तर प्रदेश) – येथील असोहा पोलिस स्टेशन परिसरातील बबुरहा या गावात तीन अल्पवयीन मुली शेतात ओढणीला बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्या. या घटनेनंतर मुलींना सार्वजनिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आलं. येथे दोन मुलींना मृत घोषित करण्यात आलं. तर तिसऱ्या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला कानपूरच्या रिजेन्सी हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलं आहे. या प्रकरणावरून विरोधी पक्ष राज्यातील भाजपच्या सरकारवर सातत्याने हल्ले करत आहे. दुसरीकडे, प्रथम दर्शनी हे विषबाधेचे प्रकरण असल्याचं पोलिसांचं म्हणणे आहे.
उन्नाव जिल्ह्यातील असोहामध्ये तीन मुली आपल्याच शेतात बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेलं. यापैकी २ मुलींचा मृत्यू रुग्णालयात झाला. तर एका मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं आहे. यामुळे शेतात गवत कापण्यासाठी गेल्या होत्या. तसंच त्याचा मृत्यू हा विषबाधेने झाला असल्याचं प्रथामिक तपासात दिसून येत आहे, अशी माहिती उन्नावच्या पोलिस अधीक्षकांनी दिली.
एकीकडे प्रशासन हे बलात्काराचे प्रकरण नसल्याचं म्हणत आहे. तर या प्रकरणात मुलींवर अत्याचार झाल्याचं सपा नेते सुनीलसिंग यादव सांगत आहेत. आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी या प्रकरणी ट्वीट केलं आहे. ‘आदित्यनाथजींचे अत्यंत भयावह राज्य मुलींसाठी स्मशानभूमी बनले आहे. उन्नावची घटना मन हेलावून सोडणारी आहे. हे अत्याचार कधी थांबणार?, असं ट्वीट करत संजय सिंह यांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे.
काँग्रेस नेत्या आराधना मिश्रा मोना यांनीही या प्रकरणी ट्वीट केलं आहे. ‘उन्नावच्या असोहा पोलिस स्टेशन भागात ३ मुली ओढणीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्या. यातील दोन मुली मृतावस्थेत सापडल्या. दुर्दैवाने, मुली कशा शिकतील, कशा पुढे जातील. हे सरकार एक तमाशा आहे. मुलींच्या होणाऱ्या निर्घृण हत्या या देशातील मुली सहन करणार नाहीत. दोषींवर त्वरित कडक कारवाई केली जावी, असं त्या म्हणाल्या.






