भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील नागदा येथे दोन दिवसांपूर्वी एका तरुणीची हत्या झाली होती. याप्रकरणी आता मोठा खुलासा झाला आहे. तरुणीच्या सावत्र वडिलांनीच आपल्या मुलीची हत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये सतत वाद होत होते. अशात दोन दिवसांपूर्वी दोघांमध्ये पुन्हा एकदा भांडण झालं. यादरम्यान तरुणी आपल्या वडिलांना टकला म्हणाली. मात्र, हा शब्द तिला चांगलाच महागात पडला. नाराज झालेल्या वडिलांनी वीट डोक्यात मारुन मुलीची हत्या केली. या घटनेत सोनालीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपीनं पोलिसांना सोनालीचा पती आरोपी असल्याची खोटी माहिती दिली.
नागदा येथील जुन्या बस स्टॅण्ड गोल्डन लॉजमध्ये झालेल्या हत्येच्या पुरव्यांआधारे पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले. शवविच्छेदनानंतर आलेले रिपोर्ट आणि इतर पुराव्यांच्या आधारे सीएसपी मनोज रत्नाकर आणि प्रभारी श्यामचंद्र शर्मा यांनी सांगितलं, की सावत्र वडील मानसिंह गुर्जर यानंच सोनालीच्या असभ्य वागण्यामुळे तिची हत्या केली. घटनेच्या दिवशी आरोपी मानसिंह सकाळी आपल्या पत्नीली भाजीपाल्याच्या दुकानात सोडून पाणी भरण्यासाठी परत आला. याचदरम्यान सोनालीनं त्याला अपशब्द वापरला. याच कारणामुळे मानसिंहला आपला राग अनावर झाला आणि त्यानं सोनालीच्या डोक्यावर वारंवार वीटेनं वार केले. यातच तिचा मृत्यू झाला.
दोन दिवसांपूर्वीच आपल्या माहेरी आलेल्या सोनालीचा मृतदेह एका रुममध्ये आढळला होता. हत्येच्या या घटनेत घरच्याच कोणाचा हात असल्याचं आधीच समोर आलं होतं. याप्रकरणी सोनालीचा पती आणि सावत्र वडील या दोघांवरही संशय होता. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि चौकशीही सुरू होती. शेवटी शवविच्छेदनानंतर आलेला रिपोर्ट आणि काही पुराव्यांसह पोलिसांनी खऱ्या आरोपीचा शोध घेतला.






