दारू न पाजल्याने नागपुरात युवकाची हत्या

नागपूर (कार्यालय प्रतिनिधी) – दारू न पाजल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात चौघांनी युवकाची हत्या करण्यात आली. बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील श्रमिकनगर, परसोडी येथे गुरुवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

राज संतोष कावरे (वय १८) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी अजय बोरगे, सचिन बोरगे, अमित बोरगे आणि रजत हंसराज बागडे (रा. सर्व परसोडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला.

मृत राज व मारेकरी एकाच परिसरातील रहिवासी असून, त्यांची एकमेकांशी ओळख आहे. सगळेच हातमजुरीची कामे करतात. याप्रकरणातील फिर्यादी राम ऊर्फ लाला रामविलोचन पटेल (वय २४) हा त्याचे मित्र प्रतीक उर्फ गोलू (वय २०) आणि राज संतोष कावरे (वय १८) यांच्यासोबत गाडीने ट्रिपलसीट जात होता. यावेळी आरोपींनी त्यांना थांबविले. आरोपींनी राम आणि त्याच्या मित्रांना दारू पाजण्याची मागणी केली.

मात्र, राम व त्याच्या मित्रांनी नकार दिला. यामुळे दोन्ही गटांमध्ये वाद सुरू झाला. दोन्ही गटांमध्ये मारामारी सुरू होती. यात आरोपींनी राजवर चाकूने हल्ला केला. यात राज गंभीर जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला. राज आणि त्याच्या मित्रांनीही आरोपींना लाकडी दांड्याने मारहाण केल्याचे समजते. यामुळे आरोपीसुद्धा जखमी असून त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. दरम्यान, बेलतरोडी पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here