औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – शहरात वाळूची वाहतूक करण्यासाठी दीड लाखाची लाच घेताना औरंगाबाद शहराच्या तहसीलदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास तहसीलदार डॉ. किशोर देशमुख यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद शहर महसूल परिसराच्या हद्दीत वाळूची वाहतूक करायची असल्यास प्रति महिना दीड लाख रुपये हप्ता देण्याची मागणी तक्रारदारकडे तहसीलदार देशमुख यांनी केली होती. ही रक्कम जर दिली गेली नाही, तर मग ठेकेदाराच्या वाहनांवर कारवाई करणार, अशी धमकी देखील देण्यात आली होती. या धमकीनंतर ही रक्कम न देता आपण लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दाखल करायची असे वाळू वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराने ठरवले, त्यानंतर याबाबतची तक्रार त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. संबंधित पथकाने लाच मागणीची शहनिशा केली. त्यानंतर तहसीलदार डॉ. कशोर देशमुख यांना रंगेहाथ पकडण्याची योजना आखण्यात आली. त्या प्रमाणे मग सापळा रचला गेला.
काल सोमवारी रात्री सुमारे साडे अकरा वाजता तहसीलदार देशमुख यांनी तक्रारदाराला पैसे घेऊन बोलावले होते. ठरल्याप्रमाणे दीड लाख रुपयांची रक्कम घेऊन तक्रारदार हा देशमुख यांच्याकडे गेला. त्यानंतर ही रक्कम स्वीकारतांना देशमुख यांना जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाचे निकाळजे आणि त्यांच्या पथकाने रंगे हाथ पकडले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती.






