नरेंद्र मोदी दिवसाचे २४ तास खोटं बोलतात; राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल

कामरूप (आसाम) – येथील विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी एका जनसभेला संबोधित केले. यावेळी राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

आसाममध्ये शनिवार, २७ मार्च रोजी विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला. पहिल्या टप्प्यात भरघोस मतदान झाले. यानंतर आता दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. राहुल गांधी यांची कामरूप येथे प्रचारसभा झाली. आपला टीव्ही ऑन करा आणि नरेंद्र मोदींचं तोंड बघा. ते दिवसाचे २४ तास खोटं बोलतात, अशी बोचरी टीका राहुल गांधी यांनी केली.

मी इथे तुमच्याशी खोटे बोलायला आलेलो नाही. कारण माझे नाव नरेंद्र मोदी नाही. शेतकऱ्यांविषयी, आसामविषयी किंवा अन्य कोणत्याही बाबतीत तुम्हाला खोटे ऐकायचे असेल, तर तुम्ही टीव्ही सुरू करा आणि नरेंद्र मोदींचे तोंड बघा. ते पूर्ण २४ तास खोटे बोलतात, असा घणाघात राहुल गांधी यांनी प्रचारसभेत बोलताना केला.

अमित शाहांचा पलटवार
काँग्रेस पक्षाचे दोन नेते भाऊ-बहीण आसाममध्ये पर्यटनाला येतात. राहुलबाबांना पाहिले की नाही? अजून चहाच्या मळ्यांमध्ये पाने नाही आली, तेवढ्या प्रियांका गांधी पाने तोडतानाचं फोटोसेशन करत आहेत. प्रियांका गांधी आधी फोटो काढून घेतील. नंतर चहा मळेवाल्यांचे जे व्हायचे ते होवो, असा पलटवार अमित शाह यांनी केला. दरम्यान, आसाममध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी अनुक्रमे १ एप्रिल आणि ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी २ मे रोजी होणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here