रायपूर – नक्षलवाद्यांच्या तावडीत सापडलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवानाची आज सुटका करण्यात आली. छत्तीसगड पोलिसांनी बुधवारी रात्रीच ही माहिती दिली. सुटका झालेला जवान बस्तर भागातील बासागुडा येथील सुरक्षा शिबीरामध्ये पोहोचण्याची शक्यता आहे, असेही पोलिसांनी सांगितले.
राकेश्वर सिंह मानहास हा जवान ‘सीआरपीएफ’च्या ‘कोब्रा’ 210 बटालियनमधील सदस्य आहे. दिनांक 3 एप्रिल रोजी नक्षलवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये सुकमा-बिजापूरच्या सीमेजवळच्या झालेल्या जंगलात झालेल्या चकमकीनंतर तो बेपत्ता झाला होता. जेथे चमकम झाली तेथून मानहास यांना बरोबर नेले असल्याचे नक्षलवाद्यांनी मंगळवारी हिंदीतून दिलेल्या निवेदनात म्हटले होते.
त्याच्या सुटकेचे प्रयत्न गेल्या दोन दिवसांपासून सुरू होते. लवकरच या जवानाची सुटका होईल, अशी आशा छत्तीसगड पोलिसांचे बस्तर विभागाचे महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी आजच व्यक्त केली होती. मात्र जोपर्यंत काही ठोस प्रगती होत नाही, तोपर्यंत या जवानाच्या सुटकेबाबत कोणताही तपशील देण्यास पोलिसांनी नकार दिला होता.
कमांडोच्या सुटकेसाठी माओवाद्यांनी कोणतीही औपचारिक मागणी केली नाही. मात्र या जवानाच्या सुटकेसाठी मध्यस्थाची मागणी सरकारकडे केली होती. या मध्यस्थासंदर्भात कोणता निर्णय झाला आणि मध्यस्थ म्हणून कोणाला पाठवायचे याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नव्हता.
शनिवारी टेकलगुडा आणि जोनागुडा या गावात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांदरम्यान जोरदार चकमक झाली होती. त्यामध्ये 22 सैनिक शहिद आणि 31 जण जखमी झाले होते. शहिद झालेल्या 22 पैकी आठ जण केंद्रीय राखीव पोलिस दलातील होते, तर 7 कोब्रा कमांडो होते. तर बस्तरिया बटालियनचा एक जवान, जिल्हा राखीव रक्षकाचे 8 आणि विशेष टास्क फोर्सचे 6 जण होते.






