रायपूर (छत्तीसगड) – येथे असणाऱ्या राजधानी रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डला शनिवारी भीषण आग लागली. या आगीमध्ये पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या रुग्णालयात कोरोना रुग्णांवरही उपचार केला जात होता असे सांगण्यात येत आहे.
ही आग शॉर्ट सर्किटमुळे झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली. या रुग्णालयात सुमारे ५० रुग्णांवर उपचार सुरू होते. आग लागल्याचे समजताच रुग्णांना दुसरीकडे हलवण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, दुर्घटनेत पाच रुग्णांचा मृत्यू झाला. काही वेळानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, मृताच्या नातेवाईकांचे सांत्वनही केले. दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली.






