नाशिक (विशेष प्रतिनिधी) – जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याच्या कारणाने नागरिक विनाकारण घराबाहेर पडून गर्दी करत आहेत. नागरिकांनी शिस्त न पाळल्यास पूर्ण लॉकडाऊन अटळ आहे. मुख्यमंत्र्यांकडे लॉकडाऊनची मागणी केल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना आढावा बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांना रेमेडेसिवीर व ऑक्सिजन पुरवठा व्हावा यासाठी प्रशासनाकडून व लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न केले जात आहे. तरीदेखील या बाबींची टंचाई भासत आहे. नागरिकांनी शिस्त न पाळल्यास पूर्ण लॉकडाऊन अटळ असल्याचा निर्वाणीचा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, की रेमेडेसिवीरचा तुटवडा जाणवत आहे. मी स्वतः मायलन कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून रेमेडेसिवीरची मागणी केली. मात्र नवीन साठा 20 एप्रिलला मिळणार आहे. नाशिक जिल्ह्यासाठी 10 हजार रेमेडेसिवीरची गरज आहे. ऑक्सिजनचीदेखील तीच परिस्थिती आहे. नाशिक जिल्ह्यासाठी 135 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. मात्र हातात फक्त 87 हजार मेट्रिक टन साठा आहे. काही दिवसातच ऑक्सिजनची मागणी 65 हजार मेट्रिक टन वरून 135 मेट्रिक टनवर जाऊन पोहचली आहे. परिस्थिती गंभीर असल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.
पुढे भुजबळ म्हणाले, की रेमेडिसिव्हर आणि ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी घटना व्यवस्थापक म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची सूचना केली आहे. तसेच कोविड रुग्णालयांच्या रेमेडिसिव्हर व ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थापनावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. रुग्णालयात रुग्णांची व्यवस्थापन योग्य होण्यासाठी तपासणी करण्याबाबत सूचना पालकमंत्री भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जिल्ह्यात शहर व ग्रामीण भागात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पोलिस विभागाने ब्रेक द चेन मोहीम हाती घेणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्व नागरिकांनी सुरक्षित अंतर, सॅनिटायझरचा आणि मास्कचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे असेही त्यांनी सांगितले.






