कोलकाता – देशात कोरोना व्हायरस संसर्गाचा प्रकोप वाढतो आहे. अशा स्थितीत केवळ निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणावर राजकीय सभा घेणे योग्य होणार नाही. ते नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते, असे सांगत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक प्रचारासाठी आयोजित केलेल्या आपल्या सर्व सभा रद्द केल्या आहेत. राहुल गांधी यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. तसेच, इतर सर्व पक्षांच्या राजकीय नेत्यांनीही हा कोरोना काळात सभा घेणे योग्य आहे का, याचा विचार करावा असे अवाहन राहुल गांधी यांनी केले आहे.
देशात कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगाल राज्यात सध्या विधानसभा निवडणुका सुरु आहेत. निवडणुकीचे काही टप्पे पूर्ण झाले आहेत. काही बाकी आहेत. अशा स्थितीत देशात कोरोना व्हायरस संसर्गाची दुसरी लाट देशात आली आहे. आशा वेळी सोशल डिस्टन्सींग पाळत महत्त्वपूर्ण रणनिती आखण्याची आवश्यकता असताना पंतप्रधानांसह देशातील अनेक महत्त्वाच नेते मोठमोठ्या राजकीय सभा घेत आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांनी मात्र पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत आता राजकीय सभा घ्यायची नाही असा निर्णय घेत त्या रद्द केल्या आहेत. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली.
राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, देशातील आणि पश्चिम बंगाल राज्यातील कोरोना व्हायरस स्थिती लक्षात घेता या राज्यातील सर्व राजकीय सभा रद्द करत आहे. माझा सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना सल्ला आहे की, सध्यास्थितीत राजकीय सभा घेणे योग्य आहे का याबाबत प्रत्येकाने विचार करायला हवा. दुसऱ्या एका ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, कोविड संकट पाहता मी पश्चिम बंगाल राज्यात आयोजित करण्यात आलेल्या माझ्या यापुढच्या सर्व सभा रद्द करत आहे. राहुल गांधी यांनी इंग्रजी आणि हिंदीमध्ये ट्विट केले आहे.
In view of the Covid situation, I am suspending all my public rallies in West Bengal.
I would advise all political leaders to think deeply about the consequences of holding large public rallies under the current circumstances.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 18, 2021
दरम्यान, देशातील कोरोना व्हायरस संसर्गाची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोना व्हायरस संक्रमितांची प्रतिदिन आढळणारी आकडेवारी ही काही लाकांच्या घरात आहे. अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर राजकीय नेते मोठ्या प्रमाणावर राजकीय सभा घेत आहेत. या सभांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार टीका होत आहे.






