अपशकुनी समजून वडिलांकडून छळ; ११ वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू

deadbody-of-girl

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – एका मुलीच्या जन्मानंतर तिच्या आजीचा मृत्यू झाला. काही दिवसांत वडिलांच्या मेडीकल दुकानाला आग लागली. म्हणून ही मुलगीच अपशकुनी असल्याचा समज वडिलांचा झाला. त्यामुळे तिचा जन्मापासून छळ सुरू केला. या ११ वर्षीय बालिकेचा रविवारी पहाटे संशयास्पद मृत्यू झाल्यानतंर तिच्या मामाने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनतंर पोलिसांनी दफन केलेला बालिकेचा मृतदेह बाहेर काढला. शवविच्छेदन केले जाणार असून, मृत्यूचे कारण स्पष्ट झाल्यानतंर या प्रकरणी पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, बालिकेच्या मामाने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर ही खळबळजनक घटना उघडकीस आली. मुलीचे वडील हे व्यवसायाने केमिस्ट आहेत. तिचे काका हे डॉक्टर व वकील आहेत. या सुशिक्षित व उच्छभ्रू कुटुंबात ११ वर्षांपूर्वी मुलीचा जन्म झाला. त्यावेळी ते कुटुंब अमळनेर येथे राहात होते. मुलीच्या जन्मानंतर काही दिवसांत तिच्या आजीचा अकस्मात मृत्यू झाला. त्या दिवसांपासून वडील मुलीचा तिरस्कार करू लागले. यानंतर दोन वर्षांनी त्यांच्या मेडिकल दुकानास आग लागल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले. त्यानतंर मुलगी अपशकुनी असल्याचा समज त्यांनी करून घेतला.

तिचे वडील सातत्याने मुलीचा छळ करू लागला. तिला दोन-तीन दिवस जेवण न देणे, सतत मारहाण करीत राहणे, भिंतीवर डोके आपटणे आदी कृत्य तो करू लागला. मुलगी पाच वर्षांची होईपर्यंत त्याच्याकडून छळ सुरू होता. तिला आजी-आजोबांनी आजोळी नेले. तिथे दोन-तीन वर्षे राहिली. त्यानतंरही तिचे आईवडील तिला भेटण्याच्या बहाण्याने पुन्हा घरी घेऊन जात. घरी नेल्यावर पुन्हा तिचा छळ करीत होते. आता तीन महिन्यांपूर्वी ते कुटुंब जळगावातील हुडको परिसरात राहण्यासाठी आले.

रविवारी (ता. २५ एप्रिल) पहाटे त्यांनी घरमालकाला झोपेतून उठवून मुलीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. यानंतर २५ रोजी सकाळी ९ वाजता दोन्ही बंधू आणि परिसरातील दोन-चार जणांच्या उपस्थितीत मुलीला दफन केले. दफनविधी झाल्यानंतर काही मिनिटांतच ते कुटुंब घराला कुलूप लावून निघुन गेले. ‘आम्ही बाहेरगावी जात आहोत’ अशी माहिती त्यांनी काही जणांना दिली होती. दरम्यान, मुलीचे निधन झाल्यानंतर ते कुटुंब अचानक निघून गेल्याने काही जणांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी या घटनेची माहिती मुलीच्या आजी-आजोबांना दिली. त्यानुसार आजी-आजोबा, मामा २६ रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी तक्रार अर्ज दिला. मुलीचा छळ केल्यामुळे तिचा मृत्यू झाला. कोणालाही न सांगता दफनवीधी केला. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार पोलिसांनी मुलीच्या कुटुंबीयांचा शोध सुरू केला. ते सापडल्यानंतर मंगळवारी त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, चौकशी सुरू आहे.

चौकशीनतंर मुलीचा मृत्यू संशयास्पदच असल्याचे निश्चित झाले. त्यानुसार पोलिसांनी मुलीच्या कुटुंबीयांची आणि नातेवाइकांची चौकशी केली. त्यांच्या जबाबांमध्ये तफावत दिसून आली. यावरून संशय बळावल्यानंतर नायब तहसीलदार राजपूत यांच्या उपस्थितीत मुलीला दफन केलेला मृतदेह बाहेर काढला. शवविच्छेनानंतर तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here