ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – भिवंडी परिसरात वाहन चोरीच्या घटनात वाढ होत असताना एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची 18 लाखांची खाजगी बस पळून नेणाऱ्या चार जणांच्या टोळीला कोनगाव पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने गजाआड केले आहे. या चोरट्यांकडून बसही हस्तगत करण्यात आली आहे. रमीज गुलाम सैय्यद वय-26, आलीम नागोमियाँ अन्सारी वय-34, मोजिम हुसैनमियाँ अन्सारी वय-46, रुस्तम नूरमोहम्मद अन्सारी वय-39, असे बस लंपास करणाऱ्या चोरट्यांची नावे आहे. विशेष म्हणजे चारही आरोपी मूळचे झारखंड राज्यातील असून ते एका चाळीच्या खोलीत भाड्याने राहत होते.
ठाण्याच्या माजिवडा परिसरात राजेश शुरप्पा पुजारी ( वय-54) हे राहतात. त्यांचा कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुजारी नावाने ट्रान्सपोर्टचे कार्यालय आहे. काल मध्यरात्री 1 वाजल्याच्या सुमारास त्यांची बस चोरटयांनी पळवली होती. त्यानंतर त्यांनी बस चोरीची तक्रार कोनगाव पोलीस ठाण्यात नोंद केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. विशेष म्हणजे चोरीला गेलेल्या बसमध्ये जीपीएस टॅक यंत्रणा लावल्याचे पोलीस पथकाला माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे ही बस ही नारपोली पोलीस ठाणे हद्दीत मानकोली परिसरात फिरत असल्याचे बसमध्ये लावलेल्या जीपीएस टॅक यंत्रणामध्ये तपास अधिकारी जीवन शेरखाने यांना दिसून आले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक शेरखाने, पोना. मासरे, पोशि. कृष्णा महाले, गणेश चोरगे, यांनी नारपोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चौधरी यांच्या मदतीने माणकोली परिसरात सापळा रचून पोलीस पथकाने बसचा शोध घेवून बस चोरी करणारे चारही आरोपी अटक केले. आता पोलीस या चोरटयांनी आणखी काही वाहने लंपास केली का याची चौकशी करीत आहेत. या गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जिवन शेरखाने करीत आहे.






