ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच, राज्यपालांनी हिंसेवरून सुनावले

कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्याने तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राजभवनात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमात निकालानंतर राज्यात उफाळलेल्या हिंसाचारावर राज्यपालांनी ममता बॅनर्जी यांना सुनावले आहे.

ममता यांनी सरकार बनविल्यानंतर आपली पहिली प्राथमिकता ही कोरोना राहणार असल्याचे सांगितले. यावर शेजारीच उभे असलेल्या राज्यपाल जगदीप धनखड यांनी राज्यात हिंसाचार सुरु आहे यावरून चिंता व्यक्त केली. यावर ममता यांनी राज्यपालांना लगेचच उत्तर दिल्याने वातावरण काहीसे तणावाचे बनले होते.

ममता बॅनर्जी यांनी मीडियाला संबोधित करताना म्हटले की, आपली प्राथमिकता कोरोना संकटावर नियंत्रण मिळविणे ही राहील. या मुद्द्यावर दुपारी बैठक बोलविण्यात आली आहे. यानंतर तीन वाजता पत्रकार परिषद घेतली जाईल. राज्यात सर्व राजकीय पक्षांनी शांतता राखावी, असे आवाहन केले. पश्चिम बंगालला अशांती आवडत नाही. सर्वांनी संयम ठेवावा आणि हिंसा करू नये. आजपासून आमच्या हातात कायदा सुव्यवस्था आली आहे. यामुळे शांतता कायम करणे आमच्यासाठी प्राथमिकता असेल. जे हिंसाचार करण्य़ात सहभागी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे त्या म्हणाल्या.

यानंतर लगेचच शेजारी उभे असलेल्या राज्यपालांनी ममतांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनल्याबाबत अभिनंदन केले. अपेक्षा करतो की सरकार कायदा आणि संविधानानुसार चालेल. भारत एक सुंदर लोकशाहीचा देश आहे, येथील सरकारे कायद्यानुसार चालतात. निवडणुकीनंतर सुरु झालेला हिंसाचार लोकशाहीसाठी धोक्याचा आहे, याबाबत मी मुख्यमंत्र्यांना अवगत केले आहे. लोक बंगालवरून चिंतेत आहेत, असे धनखड यांनी सांगितले.

मुख्यमंत्री लगेचच राज्यात कायद्याचे राज्य लागू करतील अशी अपेक्षा करतो. महिला आणि मुलांना जे नुकसान झाले आहे त्यांची मदत केली जाईल. देशाच्या संविधानाचा मुख्यमंत्री सन्मान करतील आणि राज्यासाठी काम करतील. मुख्यमंत्री, माझी छोटी बहीण यावर कारवाई करतील, कारण सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनने समोप नाहीय, तुम्ही नव्या प्रकारे शासन कराल, असे धनखड म्हणाले.

राज्यपालांच्या बोलण्यानंतर पुन्हा नवीन मुख्यमंत्री कधी बोलत नाहीत. परंतू ममता यांनी धनखड यांना लगेचच उत्तर दिले. माईक हातात घेऊन ममतांनी मी आज शपथ घेतली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून राज्य निवडणूक आयोगाकडे आहे. आयोगाने या काळात अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या, नियुक्त्या केल्या ज्यांनी काहीच काम केले नाही. अशा परिस्थितीत मी जबाबदारी स्वीकारत आहे आणि लोकांना शांती स्थापन करण्याचे आवाहन करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here