देहरादून (उत्तराखंड) – 2013 मध्ये उत्तराखंडात झालेल्या ढगफुटीनंतर आलेल्या महापुरामुळे अख्या भारताला हादरवून टाकलं होतं. 10 हजार पेक्षा जास्त लोकांचा या दुर्घटनेत मृत्यु झाला होता. आता उत्तराखंडच्या देवप्रयागमध्ये पुन्हा तीच परिस्थिती येण्याची चिन्ह दिसत आहेत. मागील दोन आठवड्यात झालेल्या 2 ढगफुट्यामुळे उत्तराखंडामधील नागरिकांमध्ये भितीचं वातावरण तयार झालं आहे.
मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता दशरथ आंचल डोंगरावर ढगफुटी झाली. यामुळे त्या ठिकाणच्या शांता नदीला पूर आला. शांता नदी बसस्थानकावरून शांती बाजारमार्गे भागीरथी या मोठ्या नदीला मिळते. महापुरात वाहून आलेल्या ढिगाऱ्यानं मोठं नुकसान झालं आहे. आयटीआयची तीन मजली इमारत त्या पुराच्या विळख्यात सापडली आहे. त्या ठिकाणच्या काही लोकांनी धावाधाव करत आपला जीव वाचवला आहे.
#Cloudburst in Devoparyag of #Uttarakhand. RTI bhawan building collapsed. pic.twitter.com/YlsuOpAbAV
— Taruni Gandhi (@TaruniGandhi) May 11, 2021
शांता नदीपासून बाजारपेठेत जाणाऱ्या रस्त्यात सायबर कॅफे, बँका, वीज, फोटोंची दुकानं इत्यादीही नष्ट झाली. दुसरीकडे शांता नदीवरील पूल, रस्त्यासह ज्वेलर्स, कपडे, मिठाई इत्यादी दुकानांनाही पुराचा फटका बसलाय. या महापुरात बाजारातील तोटा कोट्यवधींच्या घरात असल्याचा अंदाज आहे. सध्या कोणतीही जीवितहानी झालेली माहिती नाही, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
दरम्यान, कोरोना लॉकडाऊनची परिस्थिती नसती तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती, अशीही भीती आता व्यक्त केली जात आहे. एसडीआरएफ टीम घटनास्थळी पोहोचली असून शक्य तितकी मदत पुरविण्याचा प्रयत्न करत आहे.






