औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास विमलबाई ज्ञानेश्वर गाडेकर यांची हत्या करण्यात आली. ही हत्या पती ज्ञानेश्वरने केल्याचा आरोप मुलाकडून करण्यात आला आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या दोन्ही पती पत्नींत नेहमीच खटके उडत होते.
मागच्या दहा ते पंधरा वर्षांपासून ते वेगवेगळे राहत होते. त्यांना दोन मुली व दोन मुलगे आहेत. बुधवारीदेखील यांच्यात मोठे भांडण झाले पण हा वाद एवढा कि रागाच्या भरात ज्ञानेश्वरने तीक्ष्ण हत्याराने विमलबाई यांच्यावर वार केले. त्यामध्ये विमलबाई गंभीर जखमी झाल्या.
यानंतर नागरिकांनी त्यांना फुलंब्रीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अशोक मुद्दीराज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब कांबळे करत आहेत.







