महासमुंद (छत्तीसगड) – येथे एका महिलेने आपल्या ५ मुलींसह बुधवारी रात्री ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली आहे. या सर्वांचे मृतदेह गुरुवारी सकाळी रेल्वे ट्रॅकच्या ५० मीटर अंतरावर विखुरलेले आढलले. मृतांमधील सर्व मुलींचं वय १० ते १८ या वयोगटातील होतं. दारूड्या नवऱ्यासोबत वारंवार वाद होत असल्याच्या कारणावरून महिलेने हे धक्कादायक पाऊलं उचचलं. सूचना मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी पोहचले होते.
माहितीनुसार, इमलीभांठा नदीजवळ रेल्वे ट्रॅकवर गुरुवारी सकाळी लोकांनी काही मृतदेह पडलेले पाहिले. त्यानंतर त्याची माहिती कोतवाली पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहचल्यानंतर रेल्वेलाही याची माहिती दिली त्यानंतर काही वेळ याठिकाणची रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली होती. बेमचा येथील ४५ वर्षीय रहिवासी उमा साहू आणि तिचा नवरा केजराम यांच्यात अनेकदा वादविवाद व्हायचे. केजराम याला दारूचं व्यसन होतं.
बुधवारी संध्याकाळी केजराम दारू पिऊन घरी आला तेव्हा पत्नी उमा आणि त्याच्यात जोरदार भांडण झालं. हा वाद आणखी वाढत गेल्यावर उमा संध्याकाळी ७.३० च्या सुमारास पाच मुली त्यात अन्नपूर्णा, यशोदा, भूमिका, कुमकुम आणि तुलसीला घेऊन घराबाहेर पडल्या. त्यानंतर या सर्वांचा ठावठिकाणा लागला नाही. रात्री ९.३० च्या सुमारास लिंक एक्सप्रेससमोर या सर्वांनी उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उशीरा ही घटना घडली. महिला आणि ३ मुलींचा मृतदेह काही अंतरावर सापडले तर अन्य दोन मृतदेह रेल्वे ट्रॅकवर पडले होते. मृतदेहासोबत त्यांच्या चप्पलाही पडल्या होत्या. आसपासच्या लोकांची चौकशी केली असता मृतदेहाची ओळख पटली.






