मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – मालाडच्या मालवणीत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी मालवणीत जाऊन दुर्घटनेतील जखमींची चौकशी केली. तसेच दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी कांदिवलीच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालयात जाऊन घटनेत जखमी झालेल्यांची विचारपूस केली. याप्रसंगी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर, महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, महापालिकेचे सह आयुक्त चंद्रशेखर चोरे, उपायुक्त विश्वास शंकरवार आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी रुग्णांची विचारपूस केली. दुर्घटना कशी घडली? तुमच्या कुटुंबातील सर्व सुखरूप आहेत ना? जास्त मार लागला नाही ना? आदी विचारपूस केल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच डॉक्टरांशी चर्चा करून या दुर्घटनेतील गंभीर रुग्ण किती आहेत, किरकोळ मार लागलेले रुग्ण किती आहेत? कुणाची प्रकृती अधिक गंभीर तर नाही ना आदींचीही माहिती घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.
इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याची तसेच जखमीच्या उपचारांचा सर्व खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोक व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी काल रात्रीच या घटनेची माहिती मिळताच पालिका आयुक्तांशी चर्चा केली तसेच मदत व बचाव कार्य काळजीपूर्वक पार पाडण्याचे निर्देश दिले. अग्निशमन दल, महानगरपालिकेची पथके, पोलीस हे रात्रीपासून बचाव कार्य करीत होते. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेतील जखमींना तातडीने रुग्णालयांत नेऊन शासनाच्या खर्चाने उपचार करावेत हे निर्देशही दिले होते.






