ना. गुलाबराव पाटलांची नगरविकास मंत्र्यांकडे २५१ कोटींची मागणी

एकनाथ शिंदे यांचा सकारात्मक प्रतिसाद; मुंबईत लवकरच होणार बैठक

धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या शनिवारी झालेल्या एक दिवसीय दौर्‍यात झालेल्या बैठकीत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी २५१ कोटींच्या निधीचा मागणी केली असून ना. शिंदे यांनी याला अनुकुलता दर्शविली आहे. या प्रकरणी मुंबई येथे लवकरच बैठक घेण्याची ग्वाही ना. शिंदे यांनी दिल्याने जिल्ह्यातील नागरी विकासाला गती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत वृत्त असे की, ना. एकनाथ शिंदे हे शनिवारी एक दिवसाच्या दौर्‍यावर आले होते. याप्रसंगी महापालिकेत झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी नगरविकास मंत्रालयाच्या अंतर्गत जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधीची मागणी केली. यात प्रामुख्याने जळगाव महापालिकेसाठी सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेच्या अंतर्गत २०१९ मध्ये १०० कोटींची मंजुरी मिळाली होती मात्र निधीच उपलब्ध झाली नसल्यामुळे जळगांव करांचा भ्रमनिरास झाला होता. यातील ४२ कोटींच्या कामाची निविदा देखील निघाली असून ४२ कोटींच्या निधीसह तसेच नगरविकासच्या माध्यमातून जळगाव महापालिकेसाठी १५१ कोटी रूपयांचा निधी मिळावा अशी मागणी ना. गुलाबराव पाटील यांनी केली आहे. याच्या जोडीला मेहरूण तलाव आणि शिवाजी उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी ५१ कोटी रूपयांच्या निधीचा मागणी देखील करण्यात आली आहे. तर महापालिकेतील प्रलंबीत असणारा गाळेधारकांचा प्रश्‍न आणि हुडकोच्या कर्जाचा प्रश्‍न मार्गी लावण्याची मागणी देखील ना. पाटील यांनी केली आहे.

eknath-shinde-in-jalgaon

जळगाव हा राज्यात सर्वाधीक नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा (नगरपालिका, नगरिपरिषद आणि नगर पंचायती) जिल्हा असून जिल्ह्याची लोकसंख्या ४४ लाख आहे. यातील तब्बल ३२ टक्के म्हणजे १४ लाख लोकसंख्या नागरी भागात राहते. यामुळे नागरी भागाच्या विकासासाठी २५१ कोटी रूपये मिळावेत अशी अपेक्षा ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केली. यात प्रामुख्याने पारोळा, मुक्ताईनगर, शेंदुर्णी, वरणगाव व नशिराबाद येथील नगरपरिषदांना स्वत:च्या इमारती नाहीत. यामुळे यासाठी प्रत्येकी पाच कोटी अशा एकूण २५ कोटींच्या कामांना मंजुरी मिळावी अशी मागणी देखील ना. गुलाबराव पाटील यांनी केली आहे. नशिराबाद येथील नगरपरिदेच्या कर्मचार्‍यांचा आकृतीबंधी मंजूर करावा; चाळीसगाव व जामनेर येथे पूर्ण वेळ मुख्याधिकारी मिळावा तसेच जिल्ह्यातील नगरपालिका व पंचायतींमधील अधिकारी व कर्मचार्‍यांची रिक्त पदे भरण्याची मागणी देखील ना. पाटील यांनी केली आहे.

ना. गुलाबराव पाटील यांनी केलेल्या मागण्यांवर ना. एकनाथ शिंदे यांनी अनुकुलता दर्शविली असून याबाबत मुंबई येथे लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सूचित केले आहे. यामुळे नगरविकास खात्याच्या माध्यमातून जिल्ह्याच्या नागरी विकासासाठी भरीव निधी मिळण्याचे संकेत आता मिळाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here