टोकियो : भारताच्या नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरलं आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमधलं हे एकमेव सुवर्ण पदक आहे. भारताने आज ऑलिम्पिकमध्ये आत्तापर्यंतची सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रमही मोडला आहे. भारताने आतापर्यंत ७ पदके जिंकली आहेत.
नीरजसह १२ स्पर्धेक अंतिम फेरीत होते. नीरज चोप्रा (भारत), वेबर (जर्मनी), वडलेज (चेक रिपब्लिक), वेटर (जर्मनी), कॅटकवेट्स (बेलारूस), नदीम (पाकिस्तान), मियालेस्का (बेलारूस), मारडारे (मोल्डोवा), वेसली (चेक रिपब्लिक), नोवाक (रोमानिया), इटेलाटालो (फिनलँड), अॅम्ब (स्वीडन) हे स्पर्धक होते. नीरजने पहिल्या प्रयत्नात ८७.०३, दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८, तिसऱ्या प्रयत्नात ७६.९७, चौथा प्रयत्न फाऊल झाला.
भारतीय लष्करात नायब सुभेदार असणाऱ्या नीरजने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत ५ मेगा क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. त्याने आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ, आशियाई चॅम्पियनशिप, दक्षिण आशियाई खेळ आणि जागतिक कनिष्ठ स्पर्धेत सुवर्ण पदके जिंकली आहेत. नीरज चोप्राने आपले भालाफेक कौशल्य सुधारण्यासाठी जर्मनीच्या बायोमेकॅनिक्स तज्ञ क्लाऊस बार्टोनिट्झ यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे. तेव्हापासून त्याच्या कामगिरीत सातत्य राहिले आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रा यांनी स्पर्धेत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरलं आहे. समस्त देशवासियांतर्फे नीरज चोप्रा यांचे मनस्वी अभिनंदन!






