अहमदनगर (प्रतिनिधी) : अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्थिक विवंचनेतून हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. केडगावमधील मोहिनीनगर परिसात ही घटना घडली.
संदीप फाटक (वय ४५), किरण फाटक (३२), मैषिली फाटक (१०) या तिघांचा मृतदेह घरात गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. सुरूवातीला मुलीला गळफास लावून नंतर पती-पत्नीने गळफास लावून आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
रात्री फाटक कुटुंबाचे नातेवाईकांशी दूरध्वनीवरून बोलणेही झाले होते. सकाळी बराच काळ प्रतिसाद न मिळाल्याने शेजारी तसेच सासुरवाडीच्या लोकांनी घरी जाऊन पाहिले असता तिघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. फाटक गेल्या काही काळापासून आर्थिक विवंचनेत होते. त्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
सकाळी शेजाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळविले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.





