नांदेड (प्रतिनिधी) : वर्षापूवी लग्न झालेल्या एका विवाहितेवर चारित्र्याचा संशय घेत तिचा खून करण्यात आला. हा प्रकार मडरगा (ता. हदगाव) येथे रविवारी रोजी घडला. हदगाव पोलिसांनी मारेकरी पती आणि दीर या दोघांना ताब्यात घेतले आहे. रामदास बबनराव अवचार (रा. भोसी ता. कळमनुरी) यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली.
तक्रारदाराच्या बहिणीची मुलगी सगुना उर्फ गायत्री हिचे एक वर्षापूर्वी ४ ऑगस्ट रोजी मडरगा येथील संजय दत्तराव काळे सोबत झाले. या लग्नाअगोदर संजयचे पहिले पण लग्न झाले होते. लग्नानंतर नव्याचे नऊ दिवस संपल्यावर संजय पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला, तसेच मामाकडून पैसे आणण्यासाठी दबाव टाकू लागले.
११ सप्टेंबरला सगुना चक्कर येऊन पडल्याचा फोन फिर्यादीला आला. फिर्यादीने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता सगुनाच्या डोक्याला आणि डोक्याजवळ जखमा दिसून आल्या. यातच तिचा मृत्यू झाल्याने नवरा संजय दत्तराव काळे, सासरा दत्तराव, सासू कौशल्या, दीर राजू आणि जाऊ गोदावरी यांनीच भाचीचा खून केल्याची तक्रार मामाने केली. या तक्रारीवरून हदगाव पोलिसांनी कलम ३०२, ४९८, ३४ भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक कोलाने यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला आहे. हदगाव पोलिसांनी नवरा संजय दत्तराव काळे आणि दीर राजू दत्तराव काळे या दोघांना ताब्यात घेतले आहे.






