बीड (प्रतिनिधी) : जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील एका कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानं कंपनीविरोधात आंदोलन केल्याच्या रागातून कंपनीच्या मालकानं त्याला भयंकर शिक्षा दिली आहे. संबंधित कर्मचाऱ्याला आधी त्रास देऊन नोकरीवरून काढलं आणि त्यानंतर जबरदस्तीनं विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.
याप्रकरणी कंपनीच्या मालकासह चौघांवर अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. संतोष गजानन आमले असं ३५ वर्षीय फिर्यादी कर्मचाऱ्याचं नाव असून तो आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील रहिवासी आहे. फिर्यादी आमले हे संतोष कॅनफॅक्स कंपनीत ऑपरेटर म्हणून काम करत होते. दरम्यान संतोष यांनी काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळावी म्हणून कंपनीविरोधात आवाज उठवला होता. संतोष यांच्या आंदोलनाचं फलित म्हणजे कर्मचाऱ्यांचा पगार वाढला. पण कंपनीच्या विरोधात आंदोलन केल्याचा राग कंपनीच्या मालकाला आणि वरिष्ठांना आला होता.
याच रागातून कंपनीचा मालक सुभाष मुथा आणि इतर अधिकाऱ्यांनी संतोष यांना सतत त्रास द्यायला सुरुवात केली. खोटा आरोप करून आरोपींनी संतोषला कामावरून काढून टाकलं. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर 3 सप्टेंबर रोजी कंपनीचा मालक सुभाष मुथा याच्या सांगण्यावरून कंपनीचे अधिकारी संदीप धोंडिबा सुरवसे, विकास विठ्ठल होले आणि बापूसाहेब सीताराम गायकवाड या तिघांनी संतोष यांना जबरदस्तीनं विष पाजलं आहे. हा प्रकार घडल्यानंतर संतोष यांच्या नातेवाईकांनी त्वरित त्यांना नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.
याप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. अंभोरा पोलिसांनी विविध कलमांतर्गत कंपनीचा मालक सुभाष मुथासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास अंभोरा पोलीस करत आहेत.






