ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) : प्रेम संबधांच्या संशयातून पत्नीने साथीदाराशी संगनमत करून पतीची राहत्या घरताच हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी शहरालगत असलेल्या कांबागावातील पागीपाडा परिसरात घडली आहे. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे. तर तिचा साथीदार फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
संजय काशिनाथ पागी (वय ३८) असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. तर सविता संजय पागी (वय ३५) असे अटक केलेल्या पत्नीचे नाव आहे. तर अक्षय हरिचंद्र काळन (रा. वडपा, भिवंडी) असे फरार आरोपीचे नाव आहे. मृत संजय हा आरोपी पत्नीसोबत भिवंडी तालुक्यातील कांबागावातील पाड्यावर राहत होता. त्यातच आरोपी अक्षय हा पत्नी सविता हिचा मानलेला भाऊ आहे. असे आरोपी सविता नेहमी सांगत होती.
संजयला मात्र या दोघांचे प्रेमसंबध असल्याचा संशय येत होता. यावरून संजय व आरोपी अक्षयमध्ये वाद होऊन त्याला घरी येण्यास मनाई केली होती. तरी देखील आरोपी अक्षय हा मृत संजय याच्या घरी नेहमीच येणे जाणे असायचे त्यावरून पुन्हा संजय व पत्नी सविता यांच्यात कडाडून भांडण व्हायचे. त्यातच शनिवारी रात्रीच्या सुमारास पती संजय व पत्नी सविता यांच्यात पुन्हा वाद सुरु असतानाच आरोपी अक्षयने सविता हिच्या मदतीने संजय याची गळा आवळून घरातच हत्या केली.
याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात आरोपी पत्नी सविता व अक्षय विरोधात रविवारी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. मृत संजय याची पत्नी सविता हिला पोलिसांनी अटक केली असून सोमवारी तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर आरोपी अक्षय हा फरार असून निजामपूर पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती निजामपूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तथा तपास अधिकारी दिप बने यांनी दिली आहे.






