काबूल (अफगाणिस्तान) : अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्याच्या वापसीनंतर तालिबानच्या भितीनं हजारो लोकांनी देश सोडला आहे. हे सर्व लोक तालिबानची क्रूरता आणि मानवी हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या नियमांमुळे भयभीत होते. तालिबानचा क्रूरपणा आता पुन्हा एकदा समोर आला आहे. नांगरहार प्रांतात तालिबानने १३ जणांची निर्घृण हत्या केली. तालिबानच्या या क्रूर कृत्याबद्दलचा खुलासा माजी उपाध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी शनिवारी एका ट्विटमध्ये केला आहे.
अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानने जगाला सांगितले होते की, आता ते आपल्या अधिपत्याखालील नागरिकांना हक्क देतील आणि ते आता 90 च्या दशकातील तालिबान राहिलेले नाही. परंतु तालिबानी या मुद्द्यावर फार काळ टिकू शकले नाहीत. माजी उपराष्ट्रपतींनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे की, तालिबानने या १३ निरपराध लोकांना केवळ लग्नाच्या कार्यक्रमात गाणी वाजवल्यामुळे मारले. त्यांना ही गाणी बंद करायची होती.
Taliban militiamen have massacred 13 persons to silence music in a wedding party in Nengarhar. We can't express our rage only by condemnation. For 25 years Pak trained them to kill Afg culture & replace it with ISI tailored fanaticism to control our soil. It is now in works. 1/2
— Amrullah Saleh (@AmrullahSaleh2) October 30, 2021
सालेह यांनी ट्विट केलं की, ‘नांगरहारमध्ये एका लग्नाच्या कार्यक्रमात संगीत बंद करण्यासाठी तालिबानने 13 जणांची हत्या केली.’ त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे लिहिले की, प्रतिकार ही राष्ट्रीय गरज आहे आणि आपण फक्त निषेध करून आपला राग व्यक्त करू शकत नाही. माजी उपराष्ट्रपतींनी तालिबानच्या या क्रूरतेसाठी पाकिस्तानला जबाबदार धरले आहे. ते म्हणाले की अफगाण संस्कृतीला मारण्यासाठी आणि आमच्या देशावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाकिस्तानने त्यांना २५ वर्षे इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस-अनुपालन धर्मांधतेचे प्रशिक्षण दिले आणि आता त्यांचे काम सुरू झाले आहे.
१५ ऑगस्ट रोजी तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर ताबा मिळवला आणि संपूर्ण देशाचा ताबा आपल्याकडे घेतला. तालिबानने ताबा मिळवल्यानंतर अनेक आश्वासने दिली, मात्र अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा नागरिकांच्या हत्यांचे पर्व सुरू झाले आहे. अफगाणिस्तानातील लोक तालिबानच्या नियमांना घाबरत आहेत. तालिबानने टीव्हीवर संगीत आणि महिलांचे आवाज ऐकण्यावरही बंदी घातली आहे.






