सद्भावना सायकल यात्रेहून परतताना महाराष्ट्रातील तरुणाचा ओडिशात अपघाती मृत्यू

अहमदनगर (प्रतिनिधी) : येथील स्नेहालय संस्थेच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या नगर ते बांगलादेश सद्भावना सायकल यात्रेहून परतताना विशाल आहिरे यांचा अपघाती मृत्यू झाला. आहिरे प्रवास करीत असलेल्या रुग्णवाहिकेला ओडिशा राज्यात अपघात झाला. त्यात टीम लीडर आहिरे यांचा मृत्यू झाला तर त्यांचे तीन सहकारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कोलकाता येथे उपचार सुरू आहेत. आहिरे यांचे पार्थिव नगरला नेण्यात येणार आहे.

महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर रोजी अहमदनगरच्या भुईकोट किल्ला येथून ही सायकल यात्रा सुरू झाली होती. या सायकल यात्रेचे नियोजन आणि नेतृत्व विशाल अहिरे यांच्याकडे होते. शंभर सायकलस्वार या यात्रेत सहभागी झाले होते. वाटेत प्रत्येक ठिकाणचे निवास, भोजन, औषधोपचार व्यवस्था तसेच प्रत्येक राज्यातील सामाजिक संस्था यांच्याशी समन्वय साधत त्यांनी भारतातील पाच राज्ये आणि बांगलादेश मधील नवलाखीपर्यंत सद्भावना सायकल यात्रा यशस्वीपणे पार पाडली. ठरल्याप्रमाणे यात्रेचा बांगलादेशात समारोप झाला. यात्रा संपल्यानंतर भारतात पुन्हा येताना विविध मार्गांनी सायकलपटूंना रवाना करण्यात आले.

विशाल अहिरे, अजय वाबळे, संतोष धर्माधिकारी आणि योगेश जाधव हे सोबत नेलेल्या स्नेहालय संस्थेच्या रुग्णवाहिकेतून प्रवास करीत होते. ओडिशा राज्यातील भुवनेश्वर जवळ शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास भीषण अपघात झाला. यात विशाल यांचा मृत्यू झाला. जखमी असलेले अजय वाबळे, संतोष धर्माधिकारी आणि योगेश जाधव यांच्यावर कोलकाता येथे उपचार सुरू आहेत. विशाल अहिरे यांचे पार्थीव अहमदनगरकडे आणण्यात येत आहे. सोबत स्नेहालयचे डॉ. गिरीश कुलकर्णी, श्याम असावा आणि भाऊ मनोज अहिरे आहेत, अशी माहिती स्नेहालयचे हनिफ तांबोळी यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here