रांची (प्रतिनिधी ) : मोठ्या बहिणीचा वाढदिवस साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दोन सख्ख्या बहिणींचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना झारखंडच्या रांचीमधून उघडकीस आली आहे.दरम्यान या बहिणींनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा पोलीस आणि एफएसएलच्या टीमने तपास सुरु केला असून ही आत्महत्या की हत्या याचा शोध घेण्यात येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रांचीच्या एका हॉस्पिटलमध्ये मोठी बहीण शीतल लखानी काम करते. तर तिची छोटी बहीण मान्या ही सरला बिर्ला स्कूलमध्ये ९ वी इयत्तेत शिकत होती. त्यांचे वडील संजय लखानी हे रांचीच्या मोठ्या कंत्राटदारांपैकी एक आहेत. बुधवारी शीतलचा वाढदिवस होता. रात्री वाढदिवस साजरा केल्यानंतर दोन्ही बहिणी खोलीत झोपायला गेल्या. मात्र सकाळी दोघींचेही मृतदेह आढळून आले. त्यांना गुरुनानक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. शीतलचा ६ महिन्यापूर्वी साखरपुडा झाला होता तर फेब्रुवारीत तिचे लग्न होते. हि आत्महत्या आहे कि हत्या याचा पोलीस तपास करत असून शवविच्छेदनसाठी मृतदेह पाठवण्यात आले आहेत. या घटनेच्या एक दिवसापूर्वी त्यांच्या पाळीव कुत्र्याचाही ;मृत्यू झाला होता. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार वाढदिवस साजरा करून दोन्ही बहिणी आपल्या खोलीत गेल्या. त्यानंतर तिच्या आईने पहाटे ५.४० च्या सुमारास खोली उघडली असता दोन्ही बहिणींना उलट्या झाल्या होत्या व त्या बेशुद्धावस्थेत पडल्या होत्या.
रांची ग्रामीण एसपी नौशाद आलम म्हणाले की, दोन्ही बहिणींचे ज्या खोलीत मृतदेह सापडले होते ती एफएसएल तपासणीनंतर सील केली आहे.
नातेवाईकांनी म्हणण्यानुसार मोठ्या बहिणीचे लग्न ठरले असून त्या दिवशी वाढदिवसाला तिचा होणारा नवराही आला होता.
कार्यक्रम झाल्यानंतर तो त्याच्या घरी परतला होता असेही त्यांनी सांगितले.






