नवी दिल्ली (उपसंपादक जीवन षाकया) : भारतीय हॉकी संघांने आशिया कप स्पर्धेत साखळी फेरीत इंडोनेशियाचा १६-० अशा गुणफरकाने पराभव केला. भारताने या विजयाबरोबरच सुपर ४ मध्ये देखील प्रवेश केला आहे. भारताने आजचा सामना जिंकत पाकिस्तानशी बरोबरी केली. भारतासाठी गोलमधील फरक देखील पाकिस्तानपेक्षा चांगला असणे गरजेचे होते. त्यामुळे भारताला १६ गोलफरकाने विजयी होणे गरजेचे होते.
भारताने जरी इंडोनेशियाचा १६-० असा पराभव केला असला तरी भारताचा हा सर्वात मोठा विजय नाही. यापूर्वी १९३२ मध्ये ऑलिम्पिकमध्ये भारताने अमेरिकेचा २४-१ ने पराभव केला होता.
२०२३ मध्ये होणाऱ्या हॉकीच्या वर्ल्डकपचे आयोजन भारतात होणार आहे, त्यामुळे भारत वर्ल्डकपसाठी आधीच पात्र झाला होता. मात्र पाकिस्तानला २०२३ मधील वर्ल्डकपसाठी पात्रता फेरी पार करता आलेली नाही. तर जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया वर्ल्डकपसाठी पात्र झाले आहेत.
सुरूवातीच्या सामन्यात भारतीय संघ जवळपास स्पर्धेतून बाहेर गेला होता. मात्र पूल ए मधील सामन्यात जपानने पाकिस्तानचा ३-२ असा पराभव केला आणि भारताला संधी मिळाली. पहिल्या दोन सामन्यात भारताचा लौकिकास साजेसा खेळ झाला नव्हता. सलामीचा भारत – पाकिस्तान सामना १-१ असा बरोबरीत सुटला. त्यानंतर भारताला जपानकडून ५-२ असा पराभव सहन करावा लागला होता.







