प्रियकराकडून ५ वर्षाच्या मुलाची आईदेखत हत्या

चिमुकलीची हत्या

अहिल्यानगर (उपसंपादक प्रविण वराळ) : प्रेमात अडथळा ठरत असल्याने प्रियकराने ५ वर्षाच्या मुलाचा तिच्या आईदेखत खून केला. तो खून पचवण्यासाठी खुद्द आईनेच पोटच्या मुलाला प्रियकरासाठी थेट गोदावरी नदीत फेकून देत दोघे दीड महिना फरार झाले होते. २० डिसेंबर २०२४ रोजी तालुक्यातील चासनळी येथील गोदावरी नदीच्या पुलावरून पांढऱ्या कपड्यात बांधून पाण्यात एका अनोळखी लहान मुलाचा मृतदेह तरंगत असल्याची खबर पोलीस पाटील प्रकाश शिंदे यांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला दिली होती.

 

लहान मुलाचा खून नरबळीतून झाला असल्याची अफवा पसरलीहोती. पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी खून झालेल्या मुलाची ओळख पटवून खून करणारे कोण आहेत याचा शोध लावला. ५ नोव्हेंबर २०२४ रोजी शीतल ज्ञानेश्वर बदादे (रा. साकुरे मिग ता. निफाड जि. नाशिक) ही आपला मुलगा कार्तिक ज्ञानेश्वर बदादे (वय ५) याला सोबत घेवून प्रियकर सागर शिवाजी वाघ (रा. बोऱ्हाळे ता. चांदवड जि. नाशिक) याच्यासह राहता तालुक्यातील डोऱ्हाळे येथील शेतकरी सोमनाथ लांडगे यांच्या शेतात शेतमजूर म्हणून कामाला आले.

 

सागर वाघ याला शितलचा मुलगा प्रेमात अडथळा वाटत असल्याने त्याने कार्तिकचा खून केला. त्यात कार्तिकच्या आईचा सहभाग होता. दोघांनी चिमुकल्या कार्तिकच्या मृतदेहाची विल्हेवाट गोदावरी नदीपात्रात लावली. फरार झालेल्या या दोघांना तपासण्यासाठी पोलिसांनी विविध पथके पाठवून जंगजंग पछाडले पण ते मिळून येत नव्हते.

 

अखेर ८ फेब्रुवारीला शीतल आपल्या आईला भेटण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे आल्याचे पोलिसांना समजताच सापळा रचून तिला ताब्यात घेण्यात आले. पोलीसांनी तिला विश्वासात घेवून प्रियकर सागर वाघ याची चौकशी केली असता तो नाशिक जिल्ह्यात एका शेतकऱ्याकडे आश्रयाला असल्याचे सांगितले. पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडून कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये आणून अटक केल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने व पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here