पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) । पुणे-नगर महामार्गालगत खंडाळे परिसरात दरोड्याच्या प्रयत्नात आलेल्या परप्रांतीय टोळीला जेरबंद करण्यात रांजणगाव एमआयडीसी पोलीसांना यश आले आहे.
पोलीस शिपाई संतोष लक्ष्मण अडसूळ (वय ४१ रा. कारेगाव ता. शिरुर जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सुरेशभाई प्रभूभाई धामेचा (वय ५१), जितेंद्रभाई दिनेश डाभी (वय ४७), मेहुल सुरेशभाई धामेचा (वय २३), भरतभाई देवजीभाई सोळंकी (वय ३२), उत्सव जितेंद्रभाई डाभी (वय १९), भरतभाई जीवराजभाई कोळी (वय ३३ सर्व रा. मोरबी २ इंदिरा नगर ता. बी डिव्हिजन जि. मोरबी गुजरात) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडाळे (ता. शिरुर) परिसरातील मातोश्री हॉटेल शेजारील एका बंद कंपनीमध्ये काही जण हातात दांडके व हत्यारे घेऊन शिरले असल्याबाबतच्या माहितीचा फोन पोलिसांना आला. त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलीस हवालदार विलास आंबेकर, पांडुरंग साबळे, पोलीस शिपाई संतोष अडसूळ, उमेश कुतवळ यांनी खासगी वाहनाने त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली. तेव्हा काहीजण एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून पळून गेल्याचे पोलिसांना समजले.
पोलिस पुणे- नगर महमार्गावरुन जात असताना हॉटेल संग्राम समोर जि जे ३६ एल ५८९१ हि संशयीत कार पोलिसांना मिळून आली. दरम्यान पोलिसांनी पाहणी केली असता सहा जण दिसून आले. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सखोल चौकशी केली असता त्या बंद पडलेल्या कंपनीतील काही कच्चा माल चोरीच्या हेतूने आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्याजवळील सहा मोबाईल व कार जप्त केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करत आहेत.







