बंगळुरु (वृत्तसंस्था) । तुमकूर जिल्ह्यातील येदियुमध्ये २४ वर्षीय कीर्ती श्री या विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. हुंड्यासाठी सासरचे लोक तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते. तिचा नवरा तिला कधी बाथरूममध्ये कोंडायचा, तर कधी तिला बेदम मारहाण करत होता. या १० लाख रुपयांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ केला जात होता. या सततच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली असा आरोप मृत महिलेच्या माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे.
कीर्ती तुमकूरमधील मधुगिरी तालुक्यातील रहिवासी होती. नोव्हेंबर २०२३ मध्ये तिचं लग्न गुरुप्रसाद याच्याशी झालं होतं. लग्नाला सुमारे ३५ लाख रुपये खर्च झाला झाला होता. यात ४०० ग्रॅम सोनं आणि ५ लाख रुपये रोख रक्कम माहेरच्यांनी दिली होती. एवढं सगळं देऊनही कीर्ती श्रीचा पती गुरुप्रसाद आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य पैशांसाठी तिला त्रास देत होते. तिने सासरच्या मंडळींच्या आणि पतीच्या त्रासाला कंटाळून आपल्या आई-वडिलांकडेही तक्रार केली होती. त्यानंतर कीर्तीच्या कुटुंबीयांनी वाद सोडवण्यासाठी गुरुप्रसादच्या घरी तीन वेळा पंचायतही बोलावली. मात्र त्यानंतरही सासरच्या लोकांचा छळ थांबला नाही, शेवटी कीर्तीने आत्महत्या केली.
कीर्तीच्या सासरच्या लोकांनी घर बांधण्यासाठी तिच्यावर १० लाख रुपये आणण्याचा दबाव टाकल्याचा आरोप आहे. तर कीर्ती श्रीच्या वडिलांनी तिच्या सासरच्या लोकांवर हत्येचा देखील आरोप केलाय. याप्रकरणी कीर्तीच्या कुटुंबीयांनी बनाशंकरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवलीय. आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.







