नवी दिल्ली – देशातील कोरोनाच्या संसर्गाची लाट मंदावण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. देशात सध्या प्रती एक लाख लोकसंख्येमागे ३० कोरोनाबाधित आढळत असून जागतिकस्तरावर हे प्रमाण सर्वांत कमी असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले. मंत्रालयाने यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्लूएचओ) एका अहवालाचा दाखला दिला आहे. भारतात कोरोनावर मात करून बरे होणाऱ्यांचे प्रमाण म्हणजे रिकव्हरी रेट ५५.७७ टक्के म्हणजे अमेरिका, रशिया व ब्राझीलसारख्या अनेक देशांपेक्षाही जास्त आहे.
आरोग्य मंत्रालयाने सांगितलेल्या माहितीनुसार, देशातील ४.२५ लाख एकूण कोरोना रुग्णांपैकी २.३७ लाख लोक बरे झाले आहेत. ‘डब्ल्यूएचओ’च्या या अहवालात हे नमूद करण्यात आले आहे की, ‘‘ भारतात लोकसंख्येची घनता प्रचंड असूनही प्रती लाख लोकसंख्येमागील संक्रमित रूग्णसंख्येबाबत भारत जगातील सर्वांत कमी संक्रमण असलेल्या देशांमध्ये सामील झाला आहे.







