नगर (प्रतिनिधी) – पारनेर तालुक्यातील मांडओहळ धरणाजवळील धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या चार रेल्वे पोलिसांपैकी एक जण पाण्यात वाहून गेला. याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने शोध मोहीम सुरू केली आहे. रात्र झाल्याने यामध्ये यश आले नाही.
पारनेरच्या तहसिलदारांनी याबाबत माहिती दिली. अहमदनगर येथील रेल्वे पोलीस दलातील चार पोलीस कर्मचारी आज मांडओहळ धरणाजवळील रूईचोंडा धबधबा येथे गेले होते. त्यातील पोलीस कर्मचारी गणेश दहिफळे पाण्यात पडून वाहून गेले. त्यांच्यासोबत असलेले यू. एल. कोंगे, ए. एम. मुठे, जे. एस. शेख यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही, असे तहसीलदारांनी सांगितले.
पारनेरच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला याबाबत तातडीने कळविण्यात आले. त्यानंतर पथकाने तेथे धाव घेऊन शोध मोहीम सुरू केली आहे. मात्र, अंधार पडल्याने आणि पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पेच निर्माण झाला आहे. रात्र होताच शोध कार्य थांबविण्यात आले असून उद्या सकाळी शोध कार्य पुन्हा सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. सध्या धरण क्षेत्र आणि निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनास बंदी आहे. तरीही हे पोलीस तेथे का गेले होते, हा प्रश्न उपस्थित होत आहे.







