जनताभिमुख मागणीची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी,उद्या ही सह्यांची मोहीम सुरू
दोंडाईचा (विशेष प्रतिनिधी) – येथे गुरुवार आठवडे बाजाराच्या दिवशी दुकाने, शासनाकडून नियमित सुरू करण्याच्या पाश्र्वभूमीवर गावातील लहान मोठे व्यवसायिक, व्यापारी नागरिकांच्या सह्यांच्या माध्यमातून प्रतिसाद मागविण्यात आला. त्याला एका दिवसात ठराविक कमी कालावधीमध्ये नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. म्हणून प्रशासनाने आता जनताभिमुख तक्रारीची तातडीने दखल घेऊन येणारा गोर-गरिब, व्यवसायिक, व्यापाऱ्यांचा गुरुवार आठवडे बाजार सुरळीत चालू करण्याचे जाहीर करावे, अशी मागणी सर्वच दृष्ट्या खचून गेलेल्या गावातील नागरिकांकडून केली जात आहे.
कोवीळ-१९ महामारीच्या पाश्र्वभूमीवर सरकारने २२ मार्चपासून आतापर्यंत दिलेल्या सर्व गाईडलाईन, येथील जनतेने तंतोतंत पाळल्या आहेत. म्हणून येथे मागील सात महिन्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७, मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ {१} {३} व भारतीय दंड संहिता {४५ऑफ १८६०} कलम १८८ नुसार फारश्या गुन्हा दाखल व्हायच्या घटना घडल्या नाही. कारण प्रशासनाच्या लक्षात आले की, हे गाव पहिलेच लहान आहे. येथे कोणताही मोठा उद्योग धंदा, फॅक्टरी, कारखानदारी, रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. एकमेकांकडे रोजंदारीने काम करून व स्वतःचा छोटा मोठा व्यापार, व्यवसाय सुरू करून येथील लोक कुटुंब चालवत असतात. म्हणून जसजसे देशात अनलाॅक एक दोन तीन,चार, पाच सुरू झाले.
तसेच इथेही बरेचसे दैनंदिन व्यवहार सुरळीत चालू होऊन, लोकांचे जीवन आर्थिक दृष्ट्या पूर्वपदावर येऊ लागले. मात्र मागील महिन्यांपासून येथील गुरुवार आठवडे बाजार, जो सर्वसामान्य गोर-गरिब, हातावर पोट भरणाऱ्या व रोडावर दुकान थाटून कुटुंबाचे पालनपोषण करणाऱ्यांशी निगडीत आहे. तोच गुरुवार आठवडे बंद झाल्यामुळे अनेक लोकांचे हाल होत आहेत. त्यात खासकरून गरीब, कमी भांडवलात रोडावर, संध्याकाळी लाॅरीवर वस्तू विकून कुटूंब चालवण्याची ज्यांची धडपड आहे. त्यांची मानसिकता गुरुवार आठवडे बाजार गाव बंद असल्यामुळे खराब होऊन चालली आहे. म्हणून प्रत्येक लहान मोठ्या व्यवसायिक, व्यापाऱ्याला वाटत आहे की, गावात आता बाधितांची संख्या कमी किंवा नाहीच्या बरोबरीत निघत आहे. म्हणून गुरूवार आठवडे बाजार दिवशी दुकाने पूर्ववत सुरू राहिल्या तर विविध वस्तू विक्रीतून दोन पैसे कमवत घर व्यवस्थित चालवता येईल.
जनतेच्या ह्याच जनताभिमुख हाकेच्या तक्रारीची दखल घेऊन. आज गावात विविध घटकांना सोबत घेऊन गुरुवार दुकाने सुरू व्हाव्यात म्हणून सह्यांची मोहीम राबविली. त्यात एका दिवसातील ठराविक कमी वेळेत गावातील लहान मोठे व्यवसायिक, व्यापाऱ्यांनी ऊदंड प्रतिसाद दिला. आता हा प्रतिसाद उद्याही असाच मिळावा म्हणून सह्यांची मोहीम नियमीत सुरू राहील. म्हणून आता प्रशासनानेच जनताभिमुख तक्रारीची तातडीने दखल घेऊन येणारा गुरुवारपासून दुकाने पूर्ववत सुरू करून द्यावे, अशी आशा गावातील नागरिक प्रशासनाकडून करत आहे.




