नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – महानगरपालिकेच्या गळ्यातील ताईत समजल्या जाणाऱ्या वादग्रस्त उद्यान विभागाच्या कंत्राटदाराचा अजून एक गैरकारभार चव्हाट्यावर आला असून याचा फटका एका कंत्राटी कामगाराला बसला आहे.ईएसआयसी ची रक्कम पगारातून कपात होत असतांनाही ईएसआयसी कार्ड देण्यात न आल्याने उपचाराअभावी प्रवीण कदम (३२) या कामगाराचा मृत्यू झाला आहे.
यावर संतापलेल्या कामगारांनी नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली असता अजून किती कामगारांचा बळी प्रशासन घेणार,अजून किती कंत्राटदाराला पाठीशी घालणार असा प्रश्न उपस्थित केला.गेल्या १२ वर्षांपासून प्रशासन अधिकारी आणि कंत्राटदार यांनी कंत्राटी कामगारांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचेच काम केले असून किती दिवस हे चालणार असा प्रश्नही समता समाज कामगार संघटनेचे अध्यक्ष गजानन भोईर यांनी उपस्थित केला.
सोमवारी नेरुळ सेक्टर १९ मधील उद्यानात काम करणाऱ्या प्रवीण बबन कदम (३२) या कंत्राटी कामगाराचा ईएसआयसी कार्ड नसल्यामुळे उपचाराअभावी मृत्यू झाला.जर त्याच्याकडे ईएसआयसी कार्ड असते तर त्याला वेळेवर उपचार घेता आले असते आणि त्याचा जीव वाचला असता असे यावेळी भोईर यांनी सांगितले.त्याच उद्यानात काम करणाऱ्या अजून एका कामगाराची उपचाराअभावी प्रकृती गंभीर आहे.त्यालाही जर वेळेवर उपचार मिळाले नाही तर भविष्यात दगाफटका होऊ शकतो.अशी शक्यता यावेळी कामगारांनी वर्तवली.गेल्या १२ वर्षांपासून शेकडो कामगार उद्यान विभागात कंत्राटी स्वरूपात काम करत आहेत.वेळोवेळो कंत्राटदार बदलला तरी कामगार मात्र तोच राहत आहे.
प्रत्येक कामगारचे पी एफ व ईएसआयसी रक्कम पगारातून कपात केली जाते.मात्र त्याच्या सुविधा त्यांना आजही दिल्या जात नाहीयेत.लाखो करोडो रुपयांच्या फाईली बिलापोटी पालिका अधिकाऱ्यांच्या टेबलावर येतात आणि त्या डोळेझाकुन पास होतात.जर त्याच वेळी लक्ष घातले तर अनेक गैरकारभार समोर येऊ शकतात.मात्र तसे होत नसल्याने कामगार देशोधडीला लागत असल्याचे भोईर यांनी बोलतांना सांगितले.
गेल्या काही महिन्यांपूर्वी उद्यान विभागाचे एन के शहा या कंत्राट दाराला कंत्राट देण्यात आले.तो कंत्राटदार सुरवातीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने याचा फटका कामगारांना बसला आहे.त्यानेही कामगारांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम सुरु ठेवले असल्याचे यावेळी कामगारांनी सांगितले.उद्यान विभागात ६०० हुन अधिक कामगार काम करत आहेत.त्यांना कंत्राटदाराच्या माध्यमातून प्रशासन अनेक सुविधाही देण्यात येतात.मात्र त्या कामगारांपर्यंत पोहोचतच नसल्याचे उघडकीस आले आहे.कामगारांच्या जोरावर नवी मुंबई महानगरपालिका स्वछ भारत पुरस्कार,संत गाडगेबाबा अभियान यासह अनेक पुरस्कार प्राप्त करत आली आहे.त्यामुळे कामगारांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे गरज असल्याचे गजानन भोईर यांनी सांगितले.







