नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – स्वच्छ भारत मिशनमध्ये नवी मुंबईचा देशामध्ये प्रथम क्रमांक येण्यासाठी नेरूळ प्रभाग ९६ मध्ये सुशोभीकरण करण्याची मागणी जनसेवक गणेश भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
गेल्या वर्षी स्वच्छ भारत मिशन यामध्ये आपल्या नवी मुंबई शहराचा देशामध्ये तिसरा क्रमांक आला. यामध्ये पालिका अधिकारी व सफाई कामगार यांचे असलेले अतुलनीय योगदान कोणालाही नाकारता येणार नाही. महापालिका शासनाकडून सध्या स्वच्छ भारत मिशन-२०२१ अभियानास सुरूवात झालेली आहे. देशामध्ये आपल्या नवी मुंबईचा प्रथम क्रमांक यावा यासाठी आपण सर्वांनीच प्रामाणिकपणे प्रयत्नांना सुरूवातही केलेली आहे. त्याबाबत महापालिका प्रशासनाला गणेश भगत यांनी निवेदनाच्या सुरूवातीलाच शुभेच्छा दिल्या आहेत.
या अभियानामध्ये प्रभाग ९६ चाही हातभार लागावा या प्रामाणिक हेतूने हे निवेदन सादर करत असल्याचे सांगून गणेश भगत पुढे म्हणाले की, प्रभाग ९६ मध्ये नेरूळ सेक्टर १६,१६ ए, १८ चा समावेश होत आहे. प्रभागातील शाळा, मार्केट, चौक, कॉलेज, उद्यान, समाजमंदिर, सोसायटीच्या संरक्षक भिंत यांची रंगरंगोटी करण्यात यावे, सुशोभित भिंतीवर सुभाषित रंगवावीत, सुभाषितांमधून लोकप्रबोधन, जनजागृती व्हावी हाच एकमेव हेतू आहे. प्रभागातील रस्ते, गटारे, डेब्रिज हटविण्यात यावे, विद्युत डीपीची सफाई, पदपथाचीही रंगरंगोटी करणे आवश्यक आहे. आयुक्तांनी स्वत: परिसराची पाहणी करावी. प्रभागाचे सुशोभीकरण व नागरी समस्यांचे निवारण झाल्यास प्रभाग ९६ मधून स्वच्छ भारत मिशनच्या मोहीमेलाही हातभार लागेल असा आशावाद गणेश भगत यांनी निवेदनात म्हटले आहे.






