जळगाव (संपादक सुनिल पाटील) – हाथरस घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उद्देशून लिहिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, २९ सप्टेंबरला उत्तर प्रदेशातील हाथरस येथे जगाला काळीमा फासणारी व मन सुन्न करणारी घटना घडली आहे. मनिषा वाल्मिकी या तरुणींवर बलात्कार करुन तिची अत्यंत निघृणपणे हत्त्या करण्यात आली. घटना घडल्यानंतर प्रशासनाने परिवाराला न सांगता त्या तरुणीवर अंत्यसंस्कारदेखील केले. तरी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी जेणेकरुन पुन्हा कोणीही असे कृत्य करण्यास धजणार नाही.
पिडीतेच्या कुटुंबाला त्वरित न्याय न मिळाल्यास अखिल भारतीय छावा संघटना महाराष्ट्र राज्य (महिला विभाग) तर्फे तीव्र निषेध आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर अखिल भारतीय छावा संघटना उत्तर विभागीय अध्यक्षा वंदना भगवान पाटील, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष नंदूअप्पा पाटील, संजयभाऊ मराठे, वृषाली बेलोकर, केतन पाटील, किशोर पाटील, योगेश पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 







