केवळ अंडाकरीसाठी मित्राने केला दगडाने ठेचून खून

muder-by-stone

वर्धा (प्रतिनिधी मनोज बाचले) – दारू प्यायल्यानंतर अंडाकरी बनविण्यास नकार दिल्याने बनारसी याची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. मानकापूर पोलिसांनी बनारसी हत्याकांडाचा पर्दाफाश करीत मारेकऱ्याला बसस्थानकावर अटक केली. अंडाकरी बनविण्यास नकार देत उकळलेली अंडी एकट्यानेच संपविल्याने बनारसीची हत्या केल्याचे मारेकऱ्याने पोलिसांना सांगितले.

 

 


गौरव ऊर्फ निक्की शैलेंद्र गायकवाड (वय २२, रा. म्हाडा क्वॉटर्स, पिटेसूर, गोधनी रेल्वे) असे अटकेतील मारेकऱ्याचे नाव आहे. बनारसी (वय ३५) असे मृतकाचे नाव आहे. तो मजुरी करायचा. विक्की हा अवैध दारूविक्रेता आहे. त्याच्याविरुद्ध याबाबतचे गुन्हे दाखल आहेत. विक्की व बनारसी मित्र होते. शुक्रवारी रात्री हे दोघे भेटले. ‘मी अंडाकरी बनवितो, तू मला दारू पाज’, असे बनारसी विक्कीला म्हणाला. विक्कीने होकार दिला. विक्की दारू आणायला गेला. यादरम्यान अंडी उकळून बनारसी याने ती फस्त केली. काही वेळाने विक्की दारू घेऊन परतला. दोघांनी दारू प्यायली. विक्कीने बनारसीला अंडाकरीबाबत विचारणा केली. अंडाकरी बनविण्यास बनारसीने नकार दिला. उकळलेली सर्व अंडीही खाल्ल्याचे त्याने विक्कीला सांगितले.

 

 

 

संतापलेल्या विक्कीने बनारसीवर काठीने हल्ला केला. त्यानंतर दगडाने त्याचे डोके ठेचले. यात बनारसीचा मृत्यू झाला. घटनेनंतर विक्की फरार झाला. माहिती मिळताच पोलिस उपायुक्त विनीता शाहू, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश ठाकरे, पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे, उपनिरीक्षक कैलास मगर, युवराज सहारे, अमित मिश्रा, हेडकॉन्स्टेबल रवींद्र भुजाडे, अंकुश राठोड आणि प्रवीण भोयर तेथे पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून बनारसीचा मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. मानकापूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेजची पाहणी केली. विक्की हा बनारसीसोबत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी विक्कीबाबत माहिती काढली. तो बसस्थानकावर गेल्याचे पोलिसांना कळाले. पोलिसांनी सापळा रचून विक्कीला बसस्थानक परिसरातून अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here