जालिंदर बोरुडे यांना राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार जाहीर

jalindar-borude

कोरोना महामारीत केलेल्या रुग्णसेवेच्या कार्याची दखल

अहमदनगर(प्रतिनिधी)- येथील फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांना नवी दिल्ली येथील महात्मा गांधी हेल्थ फाऊंडेशनच्या वतीने राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

 

महात्मा गांधी हेल्थ फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्‍या संस्था व व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येते. कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवरील टाळेबंदी काळात फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या रुग्णसेवेच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष अनुपम श्रीनिवासन यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्य मंत्री यांच्या हस्ते लवकरच या पुरस्काराचे वितरण केले जाणार असल्याची माहिती सचिव संजय मेहता यांनी दिली.

 

फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने जालिंदर बोरुडे यांनी टाळेबंदी काळात गरजू रुग्णांची गरज ओळखून मोठ्या धाडसाने मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व विविध आरोग्य शिबीर घेतले. मागील पाच महिन्यात कोरोना काळात नियमांचे पालन करुन झालेल्या शिबीराचा तब्बल 3689 गरजूंनी लाभ घेतला. तर 740 ज्येष्ठ नागरिकांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्या. नागरिकांची विविध आरोग्य तपासणीसह नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियाचे 24 शिबीर घेण्यात आले. गरजूंना मोफत चष्मे व औषधांचे वाटप करण्यात आले. तर नागरिकांमध्ये कोरोनाबद्दल जनजागृती करुन त्याला प्रतिबंध करण्यासाठी आर्सेनिक गोळ्या, मास्क व सॅनीटायझरचे वाटप करण्यात आले.

 

टाळेबंदीमुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने अनेक रुग्ण विविध आजाराच्या उपचारापासून वंचित होते. गरजू रुग्णांची परवड होऊ नये, ही जाणीव ठेऊन फिनिक्सने नियमांचे पालन करुन घेतलेल्या उपक्रमाबद्दल बोरुडे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here