अलिबाग – सोगांवकर – रिपब्लिक टीव्हीचे मालक आणि संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर आता आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. फिरोज शेख, नितेश सारडा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहीली होती. त्या चिठ्ठीत रिपब्लिकचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरजा यांच्यामुळे आत्महत्या करत असल्याचं नमूद केले होते.
दरम्यान, अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी त्यांची पत्नी अक्षता नाईक यांनी ऑगस्ट २०२० या महिन्यात एका व्हिडिओद्वारे अर्णब गोस्वामींविरोधात तक्रार केली होती. कारवाई होत नसल्याची, न्याय मिळत नसल्याची तक्रार या व्हिडिओतून त्यांनी केली होती. याची दखल घेण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या फिरोज शेख, नितेश सारडा यांना पोलिसांनी आज संध्याकाळी न्यायालयात हजर केले.
रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी अन्वय नाईकांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप नाईक यांच्या कुटुंबीयांनी केला. अर्णब गोस्वामी यांनी सुडबुद्धीने कामाचे पैसे दिले नसल्याचा आरोप अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. तसेच अर्णब यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा हल्लाबोलही नाईक कुटुंबाने केला. त्यामुळे आता तरी अन्वय नाईकांना न्याय मिळणार का असा सवाल उपस्थित होत आहे.
अन्वय नाईक यांनी रिपब्लिकन वाहिनीसाठीच्या स्टुडिओचे काम केले होते. स्टुडीओच्या इंटेरियर डिझाईनच्या कामाची जबबाबदारी त्यांच्यावर होती. यासाठी ५ कोटी ४० लाख इतके बिल अर्णब गोस्वामी यांच्याकडून येणे होते. पण, वारंवार बिल मागूनही गोस्वामींकडून बिलाची रक्कम दिली गेली नाही. त्यामुळे मानसिक तणावाखाली अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी नाईक यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या आत्महत्येस अर्णब तसेच फिरोज शेख, नितेश सारडा यांना जबाबदार धरले होते. तसेच त्यांच्या आईने देखील आत्महत्या केली आहे. या घटनेसंदर्भात अन्वय नाईक यांच्या पत्नीने तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. रायगड पोलिसांकडून कलम ३०६ अन्वये गोस्वामी यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.







